जगभरात कोरोना रोगाने थैमान घातलेलं आहे. यामुळे जगभरातील अनेक शहरं ओस पडली आहेत. याचा परिणाम भारतातील अनेक शहरात पाहायला मिळाला. ग्रामीण भागातील लाखो कुटुंब रोजगाराच्या शोधात वेगवेगळ्या राज्यात आणि शहरात स्थलांतरित झालेले असतात. पण अचानक आलेल्या या संकटामुळे सर्व कामगारांनी पुन्हा आपल्या घरचा रस्ता धरला. आपल्या शहरात, गावात आणि राज्यात कामगार आणि मजूर मिळेल त्या मार्गाने निघाले. स्थलांतर करणाऱ्या कामगार आणि मजुरांची संख्या कितीतरी कोटींच्या घरात आहे. असच स्थलांतर देशाने याआधी देखील अनुभवलेलं होत, भारत-पाकिस्तान फाळणीनंतर अशीच परिस्थिती होती. इतिहासातील सर्वात मोठं स्थलांतर म्हणूनच भारत-पाकिस्तान फाळणीकडे पाहिलं जाते. फक्त स्थलांतरच नाही तर २० लाखांपेक्षा जास्त मृत्यू फाळणीमुळे झालेले होते.
स्थलांतराचा विषय जेव्हा निघतो तेव्हा जगभरात सगळ्यात मोठं स्थलांतर म्हणून भारत-पाकिस्तान फाळणीकडेच पाहिले जाते. इंग्रज भारतातून जाणार हे निश्चित झाल्यावर १९४० साली पहिल्यांदा मुस्लिम लीग आणि मोहम्मद अली जिना यांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करायला सुरुवात केली. तिथूनच इतिहासातल्या सर्वात मोठ्या स्थलांतराला सुरवात झाली. यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारत पाकिस्तान फाळणीचा मुद्दा थोडा बाजूला पडला. पण याने पुन्हा जोर धरला तो १९४६ साली, तोपर्यंत जिना आणि मुस्लिम लीग यांनी स्वतंत्र भारतात अल्पसंख्याक मुस्लिम हे सुरक्षित नसतील अशी भावना सर्वसामान्य मुस्लिमांच्या मनात ठासून भरवलेली होती. यातूनच असुरक्षितेतच्या भावनेमुळे अनेक मुस्लिमांनी स्वतंत्र पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला होता. तर काहींची भारतात राहण्याची तयारी होती. या सगळ्यात १९४६ साली इंग्लंडमध्ये मजूर पक्ष सत्तेत आला. सत्तेत आल्यावर काही दिवसातच त्यांनी २० फेब्रुवारी १९४७ रोजी जाहीर केलं की, ऑगस्ट १९४८ पर्यंत ब्रिटिश भारतातून बाहेर पडतील.
२२ मार्च १९४७ रोजी भारताचे नवे व्हाइसरॉय म्हणून लॉर्ड माउंटबॅटन यांची नियुक्ती झाली. फाळणी होणार हे निश्चित झाल्यावर देशात मोठया प्रमाणावर धार्मिक दंगली उसळल्या होत्या. यात प्रामुख्याने बंगाल प्रांतात दंगलीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते. हे होत असतानाच ३ जून १९४७ रोजी व्हाइसरॉय माउंटबॅटन यांनी जाहीर केलं की इंग्रज ऑगस्ट १९४८ ऐवजी ऑगस्ट १९४७ साली जाऊ शकतात. म्हणजे इंग्रज भारतातून जायला केवळ दहा आठवड्यांचा अवधी शिल्लक होता. या घोषणेचा व्हायचा तो परिणाम झाला. सगळीकडे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. भारत पाकिस्तान फाळणी होणार हे देखील निश्चित झाल्यामुळे सगळीकडे दंगलींना उधाण आलं, यात प्रामुख्याने बंगाल प्रांतातील कोलकाता शहर दंगलीचे मुख्य केंद्र होतं. हळूहळू हा लोट कुरुक्षेत्र, दिल्ली, मुंबई पंजाब असा करत संपूर्ण देश जाळत चालला होता.जसा जसा स्वातंत्र्याचा दिवस जवळ येत होता तसे दंगलीचे पडसाद अधिक वाढू लागले होते. मिळेल त्या मार्गाने पूर्व बंगालमधील लोक पश्चिम बंगालचा मार्ग धरत होते, स्वातंत्र्यानंतर फक्त भारतात आलेल्या निर्वासितांचा आकडा ८० लाख एवढा होता. यातील बंगालमधे १९५० पर्यंत १७ लाखांपेक्षा जास्त निर्वासित आले होते. यासोबत पंजाब प्रांतात मोठ्या प्रमाणावर निर्वासित येत होते. त्याकाळी लाहोर हे शहर शीख समाजाचे व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जायचे. त्यासोबत गुरू नानक यांचं जन्मस्थळ असल्याने शीख समाजाच्या धार्मिक भावना देखील लाहोर सोबत जोडल्या गेलेल्या होत्या.
शीख समुदायासोबत मुस्लिम समाजासाठी लाहोर तितकेच महत्वाचे होते. लाहोरमध्ये मोठ्या प्रमाणावर मशिदी होत्या. फाळणीआधी शीख, मुस्लिम आणि हिंदू समाज गुण्यागोविंदाने तिथे राहत होता. पण शेवटी दंगलीचा लोट तिथपर्यंत पोहचलाच. ९ ऑगस्ट रोजी पंजाब प्रांताच्या सीमा जाहीर होणार होत्या. पण त्याआधी मोठ्या प्रमाणात स्थलांतराला सुरवात झालेली होती. लोक मिळेल त्या मार्गाने जीव वाचवत कुणी पाकिस्तानात तर कुणी भारतात परतत होते. १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री ११ वाजता स्वातंत्राचा कार्यक्रम दिल्लीत सुरू झाला. पण स्वातंत्र्यच्या रात्रीपण बंगाल, पंजाब आणि दिल्ली मधील अनेक ठिकाणं जळत होती. विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट दिवशी महात्मा गांधी कोलकाता येथे, रस्ताने फिरून हिंदू मुस्लिम दोन्ही समाजांना शांतता पाळण्याचे आवाहन करत फिरत होते. दंगली शांत व्हाव्या यासाठी स्वतंत्र दिनाच्या दिवशी उपोषण देखील केलं होतं. याकाळातच स्थलांतर करत असताना दंगलींमध्ये २० लाखांपेक्षा जास्त मृत्यू झालेले होते असं अनेक अभ्यासकांचे म्हणणे होते. हे सगळं झाल्यावर देखील या काळात नेमकं किती कोटी लोकांनी स्थलांतर केलं यात संभ्रम असले, तरी जगाच्या इतिहासात भारत-पाकिस्तान फाळणी काळात झालेलं स्थलांतर सर्वात मोठं म्हणून गणले जाते.
जगभरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अनेक देशांनी फेब्रुवारी पासून सुरवात केलेली होती. पण भारतात कोरोनावर उपाय योजना करायला सुरवात मार्च महिन्यात करण्यात आली. सुरुवातीला कोरोना सारख्या आजाराला गांभीर्याने घेतलं गेलं नाही. पण अचानक जगभरात रुग्ण वाढायला लागल्याने २४ मार्च रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक पूर्ण देश लॉकडाऊन होणार असल्याची घोषणा केली. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. कामगार वर्गामध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले. कारखाने, बांधकाम, दुकाने सर्व काही पूर्णकाळ बंद करण्यात आले होते. त्यामुळं शहरात राहून उपाशी मरण्याची वेळ कामगारांवर आली. यामुळे पूर्ण लॉकडाऊन झालेलं असताना देखील अनेक मजूर आणि कुटुंब आपला संसार खांद्यावर घेवून आपल्या गावी निघालेली चित्र अनेक ठिकाणी समोर येऊ लागली. जसजशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली तसतशी चालत जाणाऱ्या कामगारांची संख्या वाढत होती. अनेक राज्यांची सरकारे मजुरांसाठी बस किंवा रेल्वे सेवा सुरू करणार असल्याचे आश्वासने दिली होती. पण हातावर पोट असणाऱ्या कामगारांना यावर विश्वास बसला नाही. ते मिळेल त्या मार्गाने आपल्या राज्य आणि शहरांकडे निघाली. लोंढेच्या लोंढे हायवेवरून जाताना दिसत होते. काही राज्यांनी आपल्या सीमा बंद केल्याने हजारोंच्या संख्येने कामगार सीमांवर अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. ही संख्या दिवसेंदिवस वाढत जाऊन लाखोंच्या घरात गेली. पण स्थलांतरित मजुरांचा अधिकृत आकडा कुणाकडेच नाही.
माहिती अधिकार कार्यकर्ते व्यंकटेश नायक यांनी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून, माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण स्थलांतर करत असलेल्या कामगार आणि मजुरांचा अधिकृत आकडा अजून आमच्याकडे नाहीये असं उत्तर त्यांना मिळालं. या सगळ्या परिस्थितीत येणाऱ्या काळात जगावं कस या भीतीने सर्व कामगार आणि मजुरांनी मिळेल त्या मार्गाने आपला घरचा रस्ता धरला. त्यामुळं दिल्ली, मुंबई, पुणे यासारखी असंख्य शहरं मोकळी पडली आहेत. अश्याच भितीमुळे फाळणीनंतर लाखो नागरिकांनी स्थलांतर केलं होतं. पण दोन्ही गोष्टींना जोडणारा एक समान धागा आहे की दोन्ही स्थलांतर हा आपला जीव वाचवण्यासाठी होती हे मान्य करावे लागेल. तेव्हा भारताची लोकसंख्या ४० कोटी होती आज भारताची लोकसंख्या १३० कोटींच्या घरात आहे. कोरोनानंतर जेव्हा ह्या सगळ्यांचा अभ्यास होऊन कामगार आणि स्थलांतरित मजुरांची संख्या जगभरातून समोर घेईल तेव्हा कोरोना काळात झालेलं स्थलांतर हे स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं स्थलांतर असेल…
– रितेश