कोरोना विषाणूच्या जगभरात वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात मार्चमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. २५ मार्च नंतर सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टी बंद करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला परिस्थितीचा अंदाज न आल्यामुळे बहुतेक लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होत. यामुळे अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली होती. या काळात मोठ्या प्रमाणावर कामगारांनी स्थलांतर केलेलं असल्याने अनेक कामगार, मजूरांच्या जगण्याचे प्रश्न निर्माण झाले होते.
मार्च महीन्यात जाहीर केलेले लॉकडाऊन सरकार एप्रिलमध्ये काढणार होते. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन वाढवण्यात आलं. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या अहवालानुसार सगळे व्यवसाय बंद होते. यामुळे एप्रिल महिन्यातच १२ कोटी १५ लाख लोक बेरोजगार झाले. यासोबत मे महिन्यात बेरोजगारीची संख्या कमी हाेऊन १० कोटींवर आली. नंतर जुन महीन्यात लॉकडाऊन शिथिल केल्याने हा आकडा २ कोटी ९९ लाख एवढा झाला. पण लोकांना घरात बसुन राहणं शक्य नव्हतं, कारण काम नाही केलं तर खाणार काय ? हा प्रश्न सगळ्याच कामगारांसमोर पडलेला होता. पण एकूणच छोट्यामोठ्या व्यवसायांना परवानगी भेटल्यानंतर बेरोजगारीची संख्या अजुन कमी होऊन ती १ कोटी १० लाख एवढी राहिली. तसेच मागच्या जुलै महिन्यामध्ये बेरोजगारांची संख्या अजुन कमी होऊन ५० लाखांवर आली. पण या ५० लाख लोकांच्या गेलेल्या नोकऱ्यांसाठी काय उपाययोजना करणार हा प्रश्न आहे
ज्या लोकांना निश्चित वेतन भेटत नाही , यामध्ये मजूर, फेरीवाले, शेतमजुर, कलाकार, बांधकाम कामगार यांना सगळ्यात जास्त तोटा झाला आहे. ‘एप्रिलमध्ये जवळपास बेरोजगार झालेल्या १२ कोटी १५ लाख लोकांपैकी ९ कोटी १२ लाख कामगार हे मजुर कामगार होते. भारतात एकूण रोजगाराच्या ३२% कामगार हे मजुर कामगार आहेत, आणि त्यापैकी ७५% कामगारांना याचा फटका बसलाय, असंही सीएमआयई अहवालात सांगितलं आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हळूहळू कामगारांचा रोजगार सुरु झाला.
लॉकडाऊन काळात चांगल्या नोकऱ्या असलेल्या लोकांना देखील आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. यासोबतअनेक कंपन्यांनी कामगार कपात देखील केली होती. यासोबत अनेक कंपन्यांनी कामगारांची पगारकपात सुद्धा केलीय. १६ ऑगस्टला चेन्नई येथील स्विगी या फूड डिलिवरी कंपनीने कामगारांच्या प्रत्येक ऑर्डर मागे २० रुपये एवढी कपात केली, यामुळे स्विगी कंपनीतील डिलिवरी करणाऱ्या कामगारांनी संप पुकारला आहे. ‘एवढी कपात केली तर आम्ही आणि घरचे खाणार काय?’ असं मत कामगारांनी व्यक्त केलंय. यामुळे सगळ्याच प्रकारच्या रोजगाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
लॉकडाऊनचा परिणाम सगळ्या क्षेत्रावर झालेला असला तरी शेती क्षेत्रावर त्याचा विशेष फरक पडलेला नाही. लॉकडाऊन काळात केवळ कृषी क्षेत्रात जास्त काम झालेलं आहे. कारण लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणावर शहराकडुन गावाकडे स्थलांतर झालेलं होतं. यामुळे गावाकडे गेलेल्या लोकांनी आपल्या शेतीकडे लक्ष दिलं. भारतात मार्चमध्ये ११ कोटी १० लाख लोक शेती करत होते. हा आकडा एप्रिलमध्ये ११ कोटी ८५ लाख एवढा झाला तर, जून महिन्यात १३ कोटी लोक शेती करत होते असे या अहवालात नमूद करण्यात आलंय.
- तुषार धायगुडे