सध्या कोरोना काळात अनेक महत्त्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र जेईई आणि नीट परीक्षा ठरलेल्या दिवशीच होणार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. पण मुलांच्या आरोग्याचा पाहता या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात किंवा रद्द कराव्यात अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी जेईई आणि नीट परीक्षा ताबोडतोब रद्द करून ॲडमिशनसाठी वेगळा पर्याय शोधण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. कोरोना काळात जेईई आणि नीट परीक्षांचे आयोजन करून केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे. भारत देश 21 व्या शतकात असताना, एखाद्या परीक्षेला पर्याय शोधू शकत नाही हे शक्य नाही.
मुळात ॲडमिशन प्रक्रिया जेईई आणि नीट परीक्षांच्या माध्यमातून होणार, हाच विचार संकुचित आणि अव्यवहारिक आहे, असे देखील मत मनीष सिसोदिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून मांडलं.
जगभरात ॲडमिशन प्रक्रियेसाठी वेगवेगळे पर्याय शोधले जात आहेत. मग भारतात प्रवेश प्रक्रियेच्या नावावर विद्यार्थ्यांचे आयुष्य टांगणीला का लावावं? असा देखील प्रश्न त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.
जेईई मेन परीक्षा 1 सप्टेंबर ते सहा सप्टेंबर या काळात होणार असून नीट परीक्षा 13 सप्टेंबरला आयोजित करण्यात आली आहे.