कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोणतेच धार्मिक स्थळे न उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, मुंबईतील तीन जैन मंदिरे पर्यूषण पर्वातील प्रार्थनेसाठी दोन दिवस उघडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला आहे.
ही मंदिरे २२ आणि २३ ऑगस्ट रोजी उघडण्यात येणार आहेत. हा निर्णय हंगामी असल्यामुळे फक्त पर्यूषण पर्वासाठी असून मुंबईतील इतर धार्मिक स्थळांसाठी लागू नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा आणि न्या. व्ही. रामसुब्रमणियन यांच्या खंडपीठाने याची परवानगी दिली आहे.
विशेषत गणेशोत्सवासाठी ही परवानगी लागू नसेल असे देखील सांगण्यात आले आहे. जैन समाजासाठी पर्यूषण पर्वाचा काळ खूप महत्त्वाचा असतो यासाठी श्वेतांबर मूर्तिपूजक ट्रस्टच्या वतीने उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. जर नियमांचे पालन होत असेल तर इतर ही मंदिरांना परवानगी देण्यास अडचण काय असे न्या. बोबडे म्हणाले आहेत.
या अगोदरची पार्श्वभूमी बघता कोरोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी गर्दी करण्यावर पूर्णपणे बंदी होती. परंतु तरी ही अनेक ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली जात होती. यामुळे कोरोनाचा प्रसार ही वाढल्याचे ही समोर आले होते.
मध्यंतरी दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकझच्या कार्यक्रमामुळे कोरोनाचा प्रसार झाल्याचा आरोप मुस्लिम बांधवांवर लावण्यात आला होता. यामुळे तबलीगी जमातीच्या २९ परदेशी नागरिकांसोबत ६ भारतीयांवर देखील कारवाई करण्यात आली होती. यानंतर ही कारवाई राजकीय दबावातून केली गेली असल्याचे न्यायालये सांगितले.
मुस्लिम समाजासाठी ईदचा सण पवित्र मानला जातो. पण मुस्लिम समाजाला हा सण सक्तीने घरीच साजरी करायला सर्वोच्च न्यायालयाने बजावले होते.