नीट आणि जेईईच्या परीक्षा पुढे ढकलणं म्हणजे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात टाकण्यासारखे आहे, असं पत्र 150 शिक्षण तज्ञांनी नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे.
जेईईची परीक्षा 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या काळात होणार असून नीट परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे. मात्र कोरोना काळात विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात न टाकता या परीक्षा पुढे ढकलाव्यात किंवा रद्द कराव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने देखील या परीक्षा पुढे ढकलण्यात किंवा रद्द करण्यास नकार दिला होता.
विद्यार्थ्यांनी फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून सरकारपर्यंत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यालाही केराची टोपली दाखवण्यात आली.
विद्यार्थी देशाचे भविष्य असतात. मात्र कोरोनामुळे त्यांचे भविष्य धोक्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना बारावीनंतर आपला प्रवेश कसा होणार याची चिंता सतावत आहे. अशा परिस्थितीत परीक्षा पुढे ढकलल्या, तर विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात येईल, असे देखील पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
त्याचबरोबर पत्रात म्हटलं आहे की राजकीय फायद्यासाठी तसेच सरकारला विरोध करण्यासाठी काही लोक परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत. मात्र यामुळे विद्यार्थ्यांची स्वप्न त्यांचे करिअर धोक्यात येतील.
मात्र फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनीच जेईई आणि नीट परीक्षा रद्द करण्याची किंवा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर आमचं आयुष्य सरकारसाठी महत्त्वाचं नाही का? असा देखील प्रश्न उपस्थित केला आहे.
त्यामुळे 150 शिक्षण तज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र ही सरकारकडूनच केली गेलेली सारवासारव तर नाही ना असा प्रश्न देखील निर्माण होतो.