दुसऱ्या महायुद्धात 6 ऑगस्ट 1945 ला अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. अणुबॉम्ब टाकल्यानंतर शहरात एका महिन्यात 1, 40,000 लोकांना आपले जीव गमवावे लागले. हे एवढ्यावरच थांबलं नाही. किरणोत्सर्गी पदार्थांमुळे पुढच्या काळात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर देशांमध्ये अणूचाचण्या करण्याची शर्यतच लागली.
त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाचा शेवट अणू युगाची सुरूवात ठरली. आंतरराष्ट्रीय पातळीवर धोरणांच्या अभावामुळे अमेरिका, रशिया फ्रान्स, चीन, ब्रिटन यासारख्या देशांमध्ये आण्विक शस्त्रे बनवण्याची शर्यत लागली. हे देश 1945 ते 1964 दरम्यान आण्विक शस्त्रे असणारे देश बनले. या काळात मोठ्या प्रमाणावर समुद्रात, जमिनीखाली, वातावरणात आण्विक स्फोट घडवून आणण्यात आले.
जर अणुबॉम्बची निर्मिती प्रत्येक देशाने केली तर पृथ्वीचा विनाश अटळ आहे याची जाणीव जगाला झाली. त्यानंतर 29 ऑगस्ट हा दिवस जागतिक आण्विक चाचणी विरोधी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
जगाला अणुशक्तीची विध्वंसकता कळावी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. अणुशक्तीचा वापर फक्त शांततेसाठी करावा हा यामागचा उद्देश आहे. या लेखातून आपण जगभरातील अणूचाचण्यांचा इतिहास थोडक्यात जाणून घेणार आहे.
आण्विक चाचण्या धोकादायक का असतात?
अणुबॉम्बची निर्मिती करत असताना, त्यामध्ये युरेनियम, प्लुटोनियम यासारखे किरणोत्सर्गी घटक वापरले जातात. हे पदार्थ वातावरणात, पाण्यात किंवा जमिनीखाली पसरले जातात. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो.
भारत आणि आण्विक चाचण्या
भारतात आतापर्यंत तीन आण्विक चाचण्या घडवून आणल्या आहेत. 18 मे 1974 मध्ये पहिली आण्विक चाचणी पोखरण, राजस्थान येथे घडवून आणण्यात आली. त्यानंतर 1998 मध्ये पुन्हा पोखरण येथे दोन चाचण्या घडवून आणण्यात आल्या.
भारताची खरा आण्विक कार्यक्रम डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी 1944 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च स्थापन केल्यानंतर सुरू झाला.
डॉक्टर होमी भाभा यांच्या नेतृत्वाखाली अणुऊर्जा कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिली. पुढे लाल बहादूर शास्त्री यांच्या काळात हा कार्यक्रम थंडावला होता. त्यांना इंडो-पाकिस्तान युद्धाला तोंड द्यावं लागलं होतं. पुढे त्यांनी विक्रम साराभाई यांची नियुक्ती या कार्यक्रमासाठी केली. मात्र साराभाईंवर गांधीजींच्या विचारांचा पगडा असल्यामुळे आण्विक शक्तीचा वापर मिलिटरीसाठी करण्याऐवजी शांततेच्या कामांसाठी केला गेला.
पुन्हा 1967 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या आणि आण्विक कार्यक्रम पुन्हा जोमाने सुरू झाला.
त्यानंतर इंदिरा गांधीनी सात सप्टेंबर 1972 ला आण्विक उपकरणे तयार करण्यासाठी आणि चाचणीसाठी तयार होण्यासाठी भाभा आटोमिक रिसर्च सेंटर तयार करण्याची परवानगी दिली.
‘स्माईलिंग बुद्धा’ असं नाव असणार्या उपकरणाचा पोखरण येथे बुद्धजयंतीला स्र्फोट घडवून आणण्यात आला. त्यातून जगाला आम्ही ही अनुचाचणी शांततेसाठी करत आहोत असा संदेश देण्यात आला. ही आण्विक योजना एवढी गुप्त होती की भारताच्या संरक्षण मंत्र्यांना याची माहिती स्फोट घडल्यावर झाली.