भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून बुधवारी 118 चायनीज अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये पबजी या प्रसिद्ध गेमचा देखील समावेश आहे. या चायनीज ॲप्सच्या वापरामुळे भारताच्या सुरक्षिततेला धोका असल्याचं मंत्रालयाकडून आलं आहे. सध्या भारत आणि चीन सीमेवर तणावाचं वातावरण आहे. याच काळात हा निर्णय घेण्यात आला आहे.
पबजीसह बंदी घालण्यात आलेल्या 118 चायनीज ॲपच्या माध्यमातून भारतीयांची वैयक्तिक माहिती बेकायदेशीर पद्धतीने भारताबाहेर असणाऱ्या सर्व्हरला पाठवली जात असल्याच्या तक्रारी या मंत्रालयाकडे आल्या होत्या.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नियंत्रणात असणाऱ्या भारतीय सायबर गुन्हा समन्वय केंद्राने देखील या ॲप्सवर बंदी घालण्याची शिफारस इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे केली होती. एवढंच नव्हे देशभरातून पबजीसारख्या ॲप्सवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत होती. अनेक तरुणांना या ॲपच्या अतिवापरामुळे आपला जीव गमवावा लागला होता.
भारताचे सार्वभौमत्व आणि एकतेला धोका पोहोचू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
जून महिन्यात 59 ॲप्सवर बंदी आणली होती
या अगोदर भारत सरकारने जून महिन्यात 59 ॲप्सवर बंदी आणली होती. यात टिकटाॅक, यूसी ब्राउजर यासारख्या प्रसिद्ध अॅप्सचा समावेश होता. त्यावेळी देखील या ॲप्समुळे भारताच्या एकता, सार्वभौमत्व आणि सुरक्षिततेला धोका असल्याचं कारण दिलं गेलं होतं.