दरवर्षी 8 सप्टेंबरला साक्षरता दिवस करायला लागतो, का? कारण आपण असाक्षर आणि अडाणी यात गल्लत करणारी जमात आहोत. ज्याला लिहिता वाचता येत नाही त्या व्यक्तीला अक्कल नसते असे मानणारे आपण लोक आहोत. आठ दहा दिवस आधी अठराशे रुपयांवरुन हक्काचे पैसे मागणाऱ्या एका कष्टकरी महिलेचा व्हिडीओ महाराष्ट्राने चवीने पाहिला आणि त्यावरुन सगळ्याच कष्टकरी महिलांबद्दल आपण किती असंवेदनशील आहोत हे ही आपण दाखवून दिले आहेच.
साक्षरता, अक्षर ओळख आणि शिकणे याचा जात, आणि पुरुषसत्ताक वर्चस्वाचा अंतरसंबंध जोवर आपण समजून घेणार नाही तोवर अशा कष्ट करणाऱ्या आणि त्यात वाचत्या लिहित्या माणसाप्रमाणे हिशेब न करणाऱ्या महिला विनोदाचा विषय बनणारच आहेत. गेली हजारो वर्षे हा देशातील दलित बहुजन आणि महिला वर्ग इथल्या ब्राह्मणी पुरुषसत्ताक सत्तेने शिकण्याच्या कौशल्यापासून जाणीवपूर्वक लांब ठेवला आहे.
वाचण्याचे कौशल्य आपल्याला जगाच्या अनेक खिडक्या उघडून देत असते, तेच नाकारले तर आपोआपच व्यवस्थेला शरण जाण्याशिवाय पर्याय रहात नाही हे लक्षात घेऊनच लोकांना शिकू न देण्याचा मार्ग इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने स्वीकारलेला आहे. त्यांना त्यांचे जगणे बदलण्याचे हक्क नाकारत सतत वंचित ठेवण्याकडे इथल्या व्यवस्थेचा कल राहिलेला आहे. साक्षरता आणि शोषणाचा संबंधच तपासायचा असेल तर कोण कोणते समाज घटक असाक्षर आहेत याची यादीही तपासून बघुयात.
आज आदिवासी समूह, भटके समुदाय आणि आर्थिकदृष्ट्या अस्थिर समुदाय प्रामुख्याने असाक्षर दिसतात. हे लोक का असाक्षर आहेत? तर जगण्यात स्थैर्य नाही म्हणून, जगण्यात स्थैर्य का नाही तर पारंपरिक कौशल्यांचा आजच्या जगण्यात फारसा उपयोग होत नाही आणि लागणारी कौशल्ये आत्मसात करण्यासाठीची साक्षरता नाही. हे दुष्टचक्र आहे.
आपण ऊसतोडणी कामगारांच्या आयुष्याकडे बघितले तर आपल्या लक्षात येईल की वर्षातले सात आठ महिने सातत्याने स्थलांतर करत असताना शाळेत बसून शिकणे ही गोष्ट जमतच नसते मग लिहिण्या वाचण्याचे कौशल्य ही टिकून राहत नाही. शेवटी पिढ्या न पिढ्या ऊस तोडणे एवढेच करायला लागते. अजूनही देशभरात अनेक समूह इतक्या मूलभूत कौशल्यापासून दूर आहेत याची जबाबदारी इथल्या व्यवस्थेने घ्यायला हवी आहे.
महात्मा जोतिराव फुले यांनी शिक्षणाची दारे उघडून आत्ता कुठे पावणेदोनशे वर्ष होत आहेत, आजवर शक्य तेवढे कष्ट करुन आमच्या आयाबहिणी शिकत आहेत तरीही अनेक महिला आणि पुरुषही या शिकण्याच्या प्रवाहातून बाजूला असलेले आपल्याला दिसतात.
या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला नीट लिहिता वाचता यायला हवे ही राजकीय लढाई आहे. वाचता लिहिता न येणारे लोक हे आपल्या बाजूचे आणि ज्यांच्यासाठी आपण इतरवेळी हक्क आणि अधिकारांच्या बद्दल बोलत असतो तेच आहेत हे लक्षात घेतले तर असाक्षरते विरुद्धची लढाई ही फक्त अक्षर ओळख करुन देण्याइतकी साधी सोपी आणि वरवरची राहणार नाही हे लक्षात येईल.
येत्या काळात कधीही साक्षरता दिवस साजरा करायची वेळ न येवो या अपेक्षेसह साक्षरता दिनाच्या सदिच्छा…
– परेश जयश्री मनोहर