पाशच्या कविता ऐकल्या की उत्साह वाढतो, बळ वाढतं, माणूस पेटून उठतो, अस्वस्थ होतो आणि बरंच काही, कारण त्याच्या कवितेत सगळ्या प्रकारचे भाव आहेत, क्रांती आहे, जाणीवा आहेत. त्यामुळे त्याच्या कवितेतील शब्द आणि शब्द जिवंत असल्यासारखे भासतात, काळजात खोलवर रुतून बसतात.
प्रत्येक कलाकार हा त्याच्या कलेमुळे ओळखला जातो, मात्र त्यापलीकडे त्याच्या एखाद्या कलाकृतीमुळे तो अजरामर होतो. पाशची ही कलाकृती म्हणजे ‘सबसे खतरनाक होता है’ ही कविता. त्याला याच कवितेमुळे लोक जास्त ओळखतात, जवळचं मानतात. या कवितेची एक पार्श्वभूमी आहे. पाश अमेरिकेत असताना एका पेट्रोल पंपावर काम करत होता. त्यावेळी त्याला असं वाटायचं की आपण असं काम करून आपल्या स्वप्नांपासून दूर जाऊन त्यांना मारून तर टाकत नाही ना? आणि याच अस्वस्थेतून या कवितेचा जन्म झाला होता, असं पाशचा एक मित्र सांगतो.
पंजाबच्या जालंदर जिल्ह्यातील तलवंडी सालेम येथे ९ सप्टेंबर १९५० रोजी पाशचा जन्म झाला. पाशचं खरं नाव ‘अवतार सिंह संधू’ मात्र पाश या टोपणनावाने त्याने लेखन केलं आणि याच नावाने पाश प्रसिध्द झाला. त्याच्या लेखनामध्ये क्रांती दिसून येते, कारण भगतसिंग यांच्या विचारांनी तो प्रभावित होता आणि योगायोग म्हणजे ज्या दिवशी भगतसिंग यांना फाशी झाली त्याच दिवशी २३ मार्च यादिवशी १९८८ मध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांनी त्याची हत्या केली.
फक्त ३८ वर्ष जगलेला पाश लोकांच्या मनात मात्र अजुन जिवंत आहे. त्याच्या कवितेची नाळ वाचकांशी मनोमन जुळते, कारण त्याच्या कवितेतील शब्द आपलेच वाटतात, ते आपल्या आजूबाजूचे असतात. पाशचं जगावर, सगळ्या गोष्टींवर खूप प्रेम होतं. तो एक संवेदनशील माणूस होता. तो प्रत्येक गोष्टी साजरा करायचा. जो काळ मुलगी झाली की नाकं मुरडण्याचा होता, त्याकाळी पाशला मुलगी झाल्यावर त्यानं ती वेळ साजरी केली होती. पूर्ण गावात मिठाई वाटली होती.
पाशने वयाच्या १५ व्या वर्षांपासून कविता लिहायला चालू केली होती. २० व्या वर्षी त्याचा ‘लौह कथा’ नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. त्याचं ‘बीच का रास्ता नही होता’ हे पुस्तक खूप विकलं गेलं होतं, मात्र त्याविषयी त्याला एक वाईट अनुभव आला होता, त्याच्या प्रकाशकाने एका वर्षात आलेल्या पैशातून त्याला काहीच रक्कम दिली नाही.
पाश हा स्वतःलाच मोठा कवी मानून घेत होता. ‘मला तुम्ही मान द्या, मला मोठा कवी म्हणा’ असा त्याचा कधीच आग्रह नव्हता. त्याचा स्वतःवर विश्वास होता. विशेष म्हणजे पाश हा पंजाबी भाषेतला कवी असून तो तेवढाच मर्यादित राहिला नाही.
पाश हा खूप स्पष्ट होता. मग ते प्रेम असो किंवा नशा, सगळ्या गोष्टी पाशने उघडपणे आणि स्पष्टपणे केल्या. त्याला विचारांमध्ये भेसळ आवडत नव्हती. त्याला भीत- भीत जगणं मान्य नव्हतं. पाशला शोषण, दमण, अत्याचारमुक्त आणि समतावादी जग पाहिजे होतं.
पाशची ‘हम लडेंगे साथी’ हि कविता आजच्या दिवशीही खूप महत्वाची ठरेल, त्या कवितेतील एक कडवं
हम लड़ेंगे साथी, उदास मौसम के लिए
हम लड़ेंगे साथी, ग़ुलाम इच्छाओं के लिएहम चुनेंगे साथी, ज़िन्दगी के टुकड़े
हथौड़ा अब भी चलता है, उदास निहाई पर
हल अब भी चलता हैं चीख़ती धरती पर
यह काम हमारा नहीं बनता है, प्रश्न नाचता है
प्रश्न के कन्धों पर चढ़कर
हम लड़ेंगे साथी
जन्मदिन मुबारक पाश!