कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्या कारणाने सर्व उद्योगधंदे, शाळा, महाविद्यालयंही बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. परंतु सध्या चालू असलेल्या अनलॉक प्रक्रियेत सर्वकाही टप्याटप्याने सुरू करण्यात येत आहे.
दरम्यान, २१ सप्टेंबरपासून शाळा अंशतः सुरू करण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारने घेतला आहे. इयत्ता नववी पासून १२ वी पर्यंतच्या शाळा अटी नियमावलीसह उघडण्याची परवानगी दिली आहे. परंतु विद्यार्थ्यांना शाळेत जायचं आहे की नाही याचा निर्णय केंद्र सरकारने विद्यार्थ्यावर सोपवला आहे.
परंतु, याव्यतिरिक्त कंटेन्मेंट झोनमधील शाळा उघडण्यास मात्र सरकारने परवानगी नाकारली आहे. कंन्टेन्मेंट झोनच्या जवळ राहणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत जाता येणार नाही. तर ज्या शाळांचा क्वारंटाइन सेंटर म्हणून वापर करण्यात आला होता त्या शाळा सुरू करण्यापूर्वी व्यवस्थित सॅनिटाईझ करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
काय असतील नियम?
विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात येणार असल्यातरी यासाठी केंद्र सरकारने कडक नियम देखील केले आहे. यात विद्यार्थ्यांना प्रत्येकामध्ये कमीतकमी ६ फुटांचं अंतर ठेवावं लागणार असून मास्कदेखील अनिवार्य असणार आहे.
या दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचं अंतर राहिल यासाठी शाळांना व्यवस्था करावी लागणार आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना खेळासाठी एकत्र येण्यास मनाई असेल.
नियमावलीत ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निंगही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे. शाळांना जास्तीतजास्त ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावण्याची परवानगी नियमावलीत देण्यात आली आहे.