आजकालच्या परिस्थितीत आणि विशेषतः या कोरोनाच्या काळात आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे. सामान्य लोकच नाही, तर विविध क्षेत्रातील कलाकारांनी देखील या काळात आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. त्यामुळे आत्महत्या किंवा मानसिक संतुलन हा विषय किती महत्वपूर्ण आणि गंभीरतेने घेणं गरजेचं आहे.
नेटफ्लिक्सवर ’13 reasons why’ नावाची वेब सीरिज आहे. त्यामध्ये मुलांमध्ये आत्महत्येसंबंधी तयार होणारी भावना आणि याच्या कारणांची खूप चांगल्या पद्धतीने उकल केली आहे. या वेबसिरीजच्या ऑफिशियल साईटवर कुणाला मदत हवी असेल तर,त्यांच्या साईटला भेट देऊन संपर्क करण्याचाही पर्याय दिला आहे. कारण मानसिक संतुलन एवढं महत्वाचं आहे. त्याचबरोबर अश्या अनेक संस्था आहेत, मार्गदर्शक आहेत, मानसशास्त्रज्ञ आहेत.
जर तुम्हाला याची गरज आहे तर काही संपर्क देत आहे. त्यावर तुम्ही नक्की संपर्क करु शकता. तुमच्या मनात सारखा आत्महत्येचा विचार येत असेल तर तुम्ही या क्रमांकांवर संपर्क करुन आपल्या समस्या सांगू शकता.
१. हितगुज : बृन्हमुंबई महानगरपालिकेचा ‘हितगुज’ उपक्रम आहे. ०२२-२४१३१२१२ हा मदत क्रमांक आहे.
२. आसरा : आत्महत्या प्रतिबंध करण्यास ही संस्था तत्पर असून, त्यासाठी ९१-२२-२७५४६६६९ हा मदत क्रमांक आहे.
३. मैत्र ही देखील संस्था मुंबई, ठाणे येथे कार्यरत आहे. ०२२-२५३८५४४७ हा त्यांचा मदत क्रमांक असून, [email protected] यावरदेखील तुम्ही संपर्क साधू शकता.
जगातील वाढत्या आत्महत्या रोखण्याच्या उद्देशाने आणि लोकांमध्ये या समस्येबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने १० सप्टेंबरला ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस'(World Suicide Prevention Day) साजरा केला जातो. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असणाऱ्या चीनमधील (Chinese Center for Disease Control and Detention) ने २०११ मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे २० लाख लोक आत्महत्या करतात.
कर्ज, प्रेमभंग, विवाहबाह्य संबंध, कार्यालयीन ताणतणाव, पालकांच्या अवाजवी अपेक्षा, मुलांच्या स्वत:विषयीच्या अपेक्षा ही अशी अनेक आत्महत्येची कारणं आहेत. १५ ते १९ वयाच्या किशोरवयीन मुलांमध्ये आत्महत्येचे महत्वाचं कारण हे परस्परांतील हिंसा आहे हे अहवालातून समोर आले आहे. महिलांमध्ये मातृत्वासंबंधीच्या परिस्थितीनंतर आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे.
WHO कडून आत्महत्येचा पहिला जागतिक अहवाल प्रसिद्ध केल्यापासून, गेल्या पाच वर्षांत राष्ट्रीय आत्महत्या रोखण्याचे धोरण बनविणाऱ्या देशांची संख्या वाढली आहे. परंतु अद्याप त्यांची संख्या केवळ 38 आहे जी खूपच कमी आहे. इतर देश आणि सरकारांनीही या दिशेने प्रभावी पाऊले उचलण्याची गरज आहे, जेणेकरून लोक स्वतःचंच आयुष्य असं संपवणार नाहीत.
जगभरात ७९ टक्के आत्महत्याच्या घटना कमी उत्पन्न किंवा विकासदर असलेल्या देशांमध्ये समोर आल्या आहेत. या देशांत प्रति १ लाख लोकांमध्ये ११.५ जण आत्महत्या करत आहेत. जास्त उत्पन्न असलेल्या देशांमध्ये महिलांच्या तुलनेत आता पुरूष हे तिप्पट आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे.
श्रीलंकेत आत्महत्येबाबत करण्यात आलेला सर्वेक्षण सर्वात प्रभावी मानला जातो. निर्बंधांच्या मोठ्या अटींमुळे आत्महत्येचं प्रमाण 1995 ते 2015 दरम्यान 70% एवढं कमी झालं होतं, तेव्हा अंदाजे 93,000 लोकांचे प्राण वाचले.
WHO चे महासंचालक टेड्रॉस अॅड्नॉम गेब्रेयझ म्हणाले की “जगभरात दर 40 सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करत आहे. प्रत्येक कुटुंब, मित्र आणि सहकारी यांच्यासाठी ही शोकांतिका आहे, आत्महत्या रोखल्या जाऊ शकतात.”
मानसशास्त्रज्ञ म्हणतात की “अशी कल्पना आपल्या मनात कधी आली तर मदत मागण्यास अजिबात संकोच करू नका. आपल्या जवळच्या एखाद्याची मदत घ्या. आपण जवळून मदतीसाठी विचारू शकत नसल्यास डॉक्टरांची मदत घ्या. कारण निराकरण न होणारी कोणतीही समस्या नाही.” म्हणून हिंमत करा आणि आपली समस्या, अडचण, मनातील गोष्टी शेअर करा, त्याला वाट द्या, त्याचा निचरा होऊ द्या.
अर्थातच ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे, अशा लोकांशी तुम्ही बोलू शकता. परंतु, मानसशास्त्रज्ञांची भेट घेणं, त्यांच्याशी चर्चा करणं हा पर्याय उत्तम ठरू शकतो, कारण सामान्य लोक म्हणून आपण आपली समस्या समजून घ्यायला, त्यावर उपाय शोधायला कमी पडू शकतो. आणि यामध्ये घाबरण्याचं किंवा लाजण्याचं कोणतंच कारण नाही. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा स्वत:चा जीव महत्वाचा आहे.
प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींची थोडी काळजी घेतली, त्यांच्या वर्तनात काही बदल दिसल्यास, बोलण्यात सातत्याने नैराश्य जाणवल्यास थोडी खोलात जाऊन चौकशी केली, सल्ला देत न बसता नुसतं ‘ऐकून’ घेतलं तरी त्या व्यक्तीला आत्महत्येच्या मार्गावरून परत आणणं शक्य आहे.
प्रत्येक आत्महत्या करणारी व्यक्ती जगायचं नसतं म्हणून हे पाऊल उचलत नाही. बहुतेक व्यक्तींना असं वाटतं, की आपली जी काही समस्या आहे ती सुटू शकणार नाही. आत्महत्या केली की आपल्याबरोबरच ती समस्याही संपेल, या विचारांमुळे या व्यक्ती आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतात.