सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्यामुळे सध्या महाराष्ट्रात तणावाचं वातावरण आहे. लातूरमध्ये एका सुशिक्षित तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र सरकारला इशारा दिला होता. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सवलती तसेच नोकरभरतीचे आरक्षण कायम ठेवावे. त्यासाठी सरकारने तातडीने अध्यादेश काढावा. अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, अश्या स्वरूपाचं ट्विट त्यांनी केलं होतं.
‘मराठा समाजाला विविध सवलती आणि योजना लागू कराव्या’
आता परत भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनी ट्विट केलं असून, आरक्षण लागू होईपर्यंत मराठ्यांसाठी विशेष योजना लागू करा. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे आरक्षण लागू होईपर्यंत मराठा समाजाला विविध सवलती आणि योजना लागू कराव्या. जेणेकरुन मराठा समाजाला आपली प्रगती साध्य करता येईल.
शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर मराठा आरक्षण वाद चांगलाच चिघळीला लागला आहे. त्यावर आपले मत मांडताना उदयनराजे भोसले यांनी आपला संताप ट्विट मधून व्यक्त केला आहे.
‘मराठा समाज आता एकटा नाही,एवढंच सांगतो’
मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार कधीच गंभीर नव्हते. त्याचा परिणाम आज मराठा समाजाला भोगावा लागत आहे. आता सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे, असा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी दिला आहे. मराठा समाज आता एकटा नाही,एवढंच सांगतो. मी सोबत आहे, असंही ते म्हणाले.
तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते.
मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.