कोरोनातून रिकव्हर झालेल्या काही रुग्णांमध्ये पुन्हा कोरोनाची लक्षणे दिसत आहेत किंवा अवयव निकामी होत आहेत. त्यामुळे कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर काय काळजी घ्यायची, त्यासाठी आरोग्य मंत्रालयाने एक नियमावली जाहीर केली आहे.
नियम पाळा
कोरोना काळात मास्क वापरणं, सोशल डिस्टन्स पाळणं, साबण किंवा सॅनिटायझरने हात धुणं या गोष्टी पाळणं अपेक्षित आहे. पण कोरोना मुक्त झाल्यावर देखील मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर यांचा वापर करायचा आहे.
योगासनं, प्राणायाम आणि मेडिटेशन करा
आरोग्य मंत्रालयाने थंड पाण्याऐवजी कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. तसेच दररोज योगासनं, प्राणायाम आणि मेडिटेशन करायचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्वसनाचे व्यायाम देखील करायचे आहेत. तसंच सकाळी किंवा संध्याकाळी ठराविक अंतर चालायचं आहे. चौकस आहार घ्यायचा असून पचायला हलक अन्न खायचं आहे.
धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन करू नका
झोप आणि आराम करायचा आहे. आरोग्य मंत्रालयाने धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन करण्यास सक्त मनाई केली आहे. कोरोनामुळे फुफ्फुसांना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे धूम्रपान न करण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा
त्याचबरोबर शरीराचं तापमान, रक्तदाब, रक्तातील साखर, हृदयाचे ठोके यासारखी आकडेवारी तपासायची आहे. जर घशात खवखव होत असेल किंवा कोरडा खोकला येत असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायच्या आहेत. तसंच वाफ घ्यायची आहे.
जर जास्त ताप आला किंवा श्वास घ्यायला अडचण निर्माण झाली किंवा शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण 95 टक्क्यांपेक्षा खाली आलं, छातीत दुखू लागलं तर तात्काळ डॉक्टरांना संपर्क साधायचा आहे.
हळदीचं दूध प्या
आरोग्य मंत्रालयाने आयुर्वेदिक काढा पिण्याचा सल्ला दिला आहे. यात गरम दुधात हळद घालून दूध प्यायचं आहे. हळद आणि मिठाच्या पाण्याने गुळण्या करायचा आहेत. त्याचबरोबर अश्वगंधा आणि गिलोय पावडर खाण्याचा देखील सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.