आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नाशिकला ओळखले जाते. मात्र सरकारने नुकतीच कांद्यावर निर्यात बंदी लागू केली आहे. याविरोधात नाशिकच्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं आहे, अशातच मोदी सरकारने निर्यातबंदी लागू केली. त्यावर शेतकऱ्यांनी सवाल केला की आता आम्ही कांदा विकायचा कुठे? आणि तो साठवायचा कुठे?
गेल्या महिन्यात कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात झाला आहे. देशात कांद्याच्या दरामधील वाढ थांबवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे असं सांगण्यात आलं आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटातून आता कुठे शेतकरीवर्ग, व्यापारवर्ग आणि कांद्याची ने आण करणारे वाहतूकदार सावरत आहेत. अशातच निर्यातबंदीचा हा निर्णय त्यांच्यासाठी घातक ठरला आहे.
सध्या जास्त प्रमाणात कांद्याचे पीक शेतकऱ्यांकडे आहे. मात्र कवडीमोलाने कांदा विकला जायचा तेंव्हा सरकार झोपले होते का असा सवाल सुद्धा शेतकऱ्यांनी विचारला आहे.