सरकारी विमान कंपनी एअर इंडिया ही बंद पडणार असल्याचे समोर आले आहे. या कंपनीचे खासगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.
एअर इंडिया कंपनीवर ६० हजार कोटींचे कर्ज असल्यामुळे या कंपनीचे खासगीकरण किंवा ती बंद करणे हे दोनच पर्याय उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी विमान संशोधन विधेयक २०२० राज्यसभेमध्ये सादर करण्याआधी दिली.
पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११-१२ पासून आतापर्यंत केंद्र सरकारने एअर इंडियामध्ये ३० हजार ५२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ही कंपनी विकल्यानंतरही सरकारला याचा फारसा फायदा होणार नाही. सध्या सरकारकडे उपलब्ध असलेला निधी आरोग्य, शिक्षण, बांधकाम यासारख्या इतर महत्वाच्या गोष्टींसाठी वापरण्याचा सरकारचा विचार आहे.
यासाठी एअर इंडियावर बोली लावण्याची मर्यादा दोन महिन्यांनी वाढवली आहे. आता इच्छुक कंपन्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत एअर इंडियासाठी बोली लावता येणार असून कंपनीसाठी लावण्यात येणारी बोली ही कंपनीच्या अस्तित्व मुल्यावर आधारित नसून एंटरप्राइझ मुल्यावर आधारित असणार आहे.
स्कूटर्स इंडियासह सहा सरकारी कंपन्या बंद
केंद्र सरकार स्कूटर्स इंडियासह अजून सहा सरकारी कंपन्या बंद करणार असल्याचं समोर आलं आहे. तर २० केंद्रीय कंपन्या आणि त्यांच्या युनिटमधील हिस्सा विकण्याची प्रक्रिया निरनिराळ्या टप्प्यांवर सध्या सुरू आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी या सहा कंपन्या बंद करण्यावर विचार सुरू असल्याची माहिती दिली आहे.
यात स्कूटर्स इंडिया, हिंदुस्तान फ्लोरोकार्बन लिमिटेड, भारत पंप्स अँड कंप्रेसर्स लिमिटेड, हिंदुस्तान प्रीफॅब, हिंदुस्तान न्यूजप्रिन्ट आणि कर्नाटक अँटीबायोटिक अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपन्यां बंद करण्याचा विचार सरकार करत आहे.