कोरोना काळात देशात आणि महाराष्ट्रात लाॅकडाऊन करण्यात आला. हा लाॅकडाऊन यशस्वी करण्यासाठी पोलीस देखील तैनात करण्यात आले. पण या दरम्यान अनेक पोलिसांवर हल्ले देखील केले गेले. तसंच अनेक जणांनी लाॅकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केलं. पण या काळात किती लोकांवर गुन्हे झाले, किती जणांना अटक झाली या सारखे प्रश्न विचारले जात आहेत. आता महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या विषयीची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
३४ हजार ९५८ व्यक्तींना अटक
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ५७ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३४ हजार ९५८ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २५ कोटी २५ लाख ४४ हजार ६६४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
तसेच राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे 22 मार्च ते 16 सप्टेंबर या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 356 घटना घडल्या. त्यात 894 व्यक्ती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तसंच 100 नंबरवर आलेले फोनची संख्या १ लाख 13 हजार 044 इतकी होती.
तसंच अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत 1346 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यादरम्यान 96, 160 वाहनं जप्त करण्यात आली आहेत.
208 पोलिस बांधवांचा मृत्यू
तसंच गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील 187 पोलीस व 21 अधिकारी अशा एकूण 208 पोलिस कर्मचारी तसेच अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला.
पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.