कार्ल मार्क्स माहित नसलेला क्वचितच एखादा व्यक्ती असेल. बहुतेक सर्व लोकांना निदान मार्क्स हे नावतरी माहित आहे, मात्र बहुतेक लोकांना नावापलीकडे काहीच माहीत नाही एवढंही तितकंच खरं आहे. कारण जगाच्या इतिहासात ज्या काही लोकांचे कायमस्वरूपी ठसे असणार आहेत त्यामध्ये मार्क्सचा ठसा हा अधिक गडद असणार आहे.
ज्यावेळी २००५ साली अमेरिकेत सुरू झालेली मंदी जगभर पसरली. ‘अर्थव्यवहारात सरकारने हस्तक्षेप करू नये’ असं जगाला सांगणाऱ्या स्वतः अमेरिकेने डबघाईला बँकांना वाचवण्यासाठी जनतेकडून अब्जावधी डॉलर्स गोळा करून वाचवण्याचा प्रयत्न केला होता. या मंदीत गोंधळलेल्या युरोप, अमेरिका, जर्मनी इ. देशांना मार्क्सचे अर्थशास्त्राचे सिध्दांत पुन्हा एकदा वाचावे लागले होते. एवढं महत्व मार्क्सचं आजच्याही जगात टिकून आहे आणि ते टिकून राहील.
मार्क्सचा जन्म १८१८ साली जर्मनीत झाला आणि १८८३ साली इंग्लंडमध्ये त्याचा मृत्यू झाला. मात्र या ६५ वर्षाच्या काळात त्याने अनेक सिध्दांत मांडले, पुस्तकं लिहिली आणि जगाला एक वेगळं वळण दिलं. भारतात ज्यावेळी १८५७ चे बंड झाले होते त्याबद्दल हा स्वातंत्र्याचा पहिला लढा असं इंग्लंडमध्ये सांगितलं होतं. भारतातील उत्पादनपद्धती, खेड्यांच्या स्वयंपूर्णतेचा विचार यावरदेखील मार्क्सने भाष्य केलं होतं.
मार्क्सने अनेक विषयावर लिहिले आहे. त्याने फक्त अर्थशास्त्रावरच नाही तर, तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि धर्मशास्त्रावरदेखील लिहिलं आहे. दास कॅपिटल हा प्रसिध्द ग्रंथ मार्क्सने १८६७ साली प्रकाशित केला.
अनेक अर्थतज्ञांनी भांडवलशाही ही एक स्थिर आणि शाश्वत व्यवस्था आहे, असे मानले. मार्क्सने मात्र त्यांचे विश्लेषण करून का आणि कशी बदलत आहे, हे दाखवून दिले. त्याने भांडवलशाहीचे वर्णन ‘नफ्यासाठी उत्पादन’ असं केलं आहे आणि दोन प्रकार असलेल्या कामगार आणि भांडवलदार यातील कामगाराच्या शोषणातून हा नफा तयार होतो, असं मार्क्स म्हणतो.
१८६४ मध्ये मार्क्सने मजूर संघाची स्थापना केली. त्याची नियम, ध्येयधोरणे मार्क्सनेच ठरवली होती. त्यानंतर काही कारणांमुळे हा संघ भाग पावला, मात्र अजूनही त्याच्या प्रेरणेने अनेक देशांत कामगार संघांच्या माध्यमातून मार्क्स जिवंत आहे.