उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या १९ वर्षीय दलित तरुणीने आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या १४ सप्टेंबर रोजी चार सवर्ण तरुणांनी १९ वर्षीय दलित तरुणीचा बलात्कार करुन सोबत तिची जीभ छाटून मान मोडण्यात आल्याचा अमानुष प्रकार घडला होता.
बेशुद्धावस्थेत आढळलेल्या या मुलीला अलीगढच्या जे एन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान सुरुवातीला एका आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी तरुणावर बलात्काराचा नाही तर छेडछाडीचा गुन्हा दाखल केला होता. परंतु २३ तारखेला तरुणीच्या जबाबानंतर पोलिसांनी ८ दिवसांनंतर सामुहिक बलात्काराचं एफआयआरमध्ये सामुहिक बलात्काराचे कलम ३०७ जोडण्यात आले.
तरुणीच्या मृत्यूपूर्वी तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं की, १४ सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी आपल्या शेतात गेली होती.
याठिकाणी सवर्ण समाजातील चार तरुणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली तेव्हा तिची जीभ छाटलेली होती तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झाली होती. कुटुंबियांनी आरोप केला होता की, “त्यांच्या घराजवळ राहणारा २० वर्षीय सवर्ण समाजातील तरुण आणि त्याचे काही नातेवाईक कायम या भागातील दलित समाजातील व्यक्तींना त्रास देत.
पिडित मुलगी ज्या गावामध्ये राहते त्या गावात एकूण ६०० कुटुंबांपैकी केवळ १५ दलित कुटुंब आहेत. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या घराजवळील तीन व्यक्तींना सुरुवातीला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील एकजण फरार झाला होता त्यानंतर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवल्याचे आरोप अनेकांनी लावले आहे.
या प्रकरणानंतर भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी पिडित तरुणीची भेट घेतली होती. पुढे हे प्रकरण चांगलंच तापल्यानंतर युपी सरकारने पीडितेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली.