भाजपाच्या आमदाराने हाथरस बलात्कार प्रकरणावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. बलात्काराच्या घटना जर थांबवायच्या असतील, तर आई वडिलांनी मुलींना चांगले संस्कार लावावेत, असं वादग्रस्त विधान भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस गावात झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर देशभरात संतापाचं वातावरण आहे. एका पत्रकाराने सुरेंद्रसिंह यांना विचारलं की उत्तर प्रदेशात रामराज्य आहे, असं म्हटलं जातं, तरीदेखील या ठिकाणी महिलांवर सातत्याने अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना सुरेंद्रसिंह म्हणाले की बलात्काराच्या घटना थांबवण्यासाठी आई-वडिलांनी मुलींना चांगले संस्कार लावण्याची गरज आहे.
ते म्हणाले की ज्याप्रकारे मुलींचे संरक्षण करण्याचा सरकारचा धर्म आहे, त्याच प्रकारे मुलींना चांगले संस्कार लावण्याचा आई-वडिलांचा धर्म आहे. मुलींनी कसं चालावं, कसं वागावं, समाजात वावरताना वागणूक कशी ठेवावी, याचे संस्कार मुलींना देणं गरजेचं आहे.
#WATCH Incidents like these can be stopped with help of good values, na shashan se na talwar se. All parents should teach their daughters good values. It's only the combination of govt & good values that can make country beautiful: Surendra Singh, BJP MLA from Ballia. #Hathras pic.twitter.com/47AmnGByA3
— ANI UP (@ANINewsUP) October 3, 2020
सुरेंद्रसिंह यांच्या या विधानाचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतला जातोय. समाजात बलात्काराच्या घटना थांबवायच्या असतील तर याची जबाबदारी फक्त मुलींची आहे का? सरकारची भूमिका महत्त्वाची नाही का? किंवा मुलांना संस्कार लावण्याची गरज नाही का? हे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत.