सध्या लहान मुलांमध्ये लॅपटॉप किंवा मोबाइलच्या मदतीने लिखाणाचं प्रमाण खूप वाढलं आहे. नजिकच्या काळात कागद आणि पेन्सिल नामशेष होतील की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. लॅपटॉप किंवा मोबाईलवर लिखाण केल्यानं कागदाची बचत होते. तसेच हे लिखाण सोप्या पद्धतीने कुठेही प्रसिद्ध करता येतं.
पण शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार हाताने केलेलं लिखाण कीबोर्डच्या लिखाणापेक्षा जास्त फायदेशीर असल्याचं दिसून आलं आहे. अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आलं आहे की हातानं कागदावर लिखाण केल्यास लहान मुलं तसेच प्रौढ लवकर आणि अधिक चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. तसेच त्यांची लक्षात ठेवण्याची क्षमता देखील वाढते. सध्याच्या काळात लहान मुलांमध्ये किबोर्डच्या मदतीने लिखाण करण्याचं प्रमाण वाढलं आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये बहुतेक शाळेत टॅबलेट किंवा लॅपटॉपच्या मदतीने मुलांना लिखाणाचं काम दिलं जातं.
मात्र या संशोधनानुसार जर स्मरणशक्ती चांगली ठेवायचे असेल, तसंच नवीन गोष्टी लवकर शिकायच्या असतील तर कागदावर लिखाण करायची सवय लावायला हवी, असं सांगितलं आहे. संशोधकांनी हाताने लिहिणं चांगलं की कीबोर्डच्या मदतीने लिहिणं चांगलं, याचा अभ्यास करण्यासाठी 250 लोकांवर प्रयोग केला. त्यांना असं आढळून आलं की, जेव्हा एखादा व्यक्ती कागदावर लिहीत असतो, तेव्हा त्याच्या मेंदूत कीबोर्डवर लिहिण्याच्या तुलनेत अधिक प्रतिक्रिया होत असतात.
जेव्हा आपण हाताने लिखाण करतो तेव्हा प्रत्येक अक्षर लिहिण्यासाठी पेन्सिल किंवा पेनवर वेगवेगळ्या प्रकारे दबाव द्यावा लागतो. त्यामुळे मेंदूचा विकसित होण्यास मदत होते. सध्याच्या काळात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे पुन्हा हाताने कागदावर लिखाणाची पद्धत वापरणं सोयीचं ठरणार नाही. मात्र लहान मुलांना हातानं लिहिण्याचं ठराविक प्रशिक्षण देणं गरजेचं असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.