भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोरोना महामारीमुळे उशीर झाला असल्याचं सांगितलं, मात्र आता त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं ते बोलले आहेत.
नड्डा हे कार्यकर्त्यांशी बंगालमधील सिलगुडी मध्ये झालेल्या भेटीमध्ये बोलत होते. यामध्ये त्यांनी पश्चिम बंगाल सरकारवर टीका देखील केली. पश्चिम बंगाल सरकार हे ‘फोडा आणि राज्य करा’ नीतीचा अवलंब करत असल्याचं ते म्हणाले. २०२१ मध्ये बंगालमध्ये विधानसभेसाठी निवडणूक असणार आहे. त्याची पूर्वतयारी आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी आपल्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी शेतकऱ्यांसाठी असलेली उपाययोजना व्यवस्थित पार पाडल्या नाही. शेतकऱ्यांसाठी असणारी “पीएम किसान सम्मान योजना” देखील त्यांनी राबवली नसल्याचं त्यांनी सांगितलं. आपण जर सत्तेत आलो तर शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व योजना उपलब्ध करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मात्र नड्डा यांच्या टीकेवर तृणमूलचे खासदार डेरेक ऑब्रायन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय, ते म्हणाले जेव्हा “भाजप फोडा आणि राज्य करा याविषयी बोलतात, त्यामध्ये वेगळं असं काहीच नाही, कारण भाजप स्वतःच अशी खेळी पूर्वीपासून खेळत आहे आणि त्यासाठी ते कोणत्याही स्तराला जातात.”
दरम्यान सीएए विधेयका विरोधा कोरोनापुर्वी देशभरात जोरदार आंदोलने करण्यात आली होती, याची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनी देखील घेतलेली होती. याच विरोधात शाहीन बाग येथे सुरु असणाऱ्या आंदोलनातील दादीचा फोटो टाइम्स मॅगझीनेन जगातील शंभर व्यक्तींमध्ये गणला होता.
वाचा – शाहीन बागच्या “दादी” जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत!