मागच्या काही दिवसात कोरोनामुळे भारताला आर्थिक फटका बसल्यानंतर देशासाठी अजुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिडनीतील लोवी या संस्थेने एक अभ्यास करून आशियातील प्रभावशाली देशांनी यादी जाहीर केली आहे. आशिया पॉवर इंडेक्स फॉर २०२० हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
त्यानुसार भारत हा पॅसिफिक प्रदेशात चौथा प्रभावशाली देश ठरला आहे, मात्र भारत सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीतून बाहेर फेकला गेला आहे. गतवर्षी भारत ४१ गुणांसह सर्वात प्रभावशाली असणाऱ्या देशांच्या यादीत होता. मात्र यावर्षी ते गुण कमी होऊन ३८.७ एवढे झाले आहेत.
आशिया पॅसिफिक प्रदेशात कोरोना महामारीमुळे व्यवस्था बिघडलेल्या १८ देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारताच्या सर्व प्राथमिक गरजांवर ताण पडून देशाची आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती खालावली आहे, असं लोवीच्या अहवालात म्हणण्यात आलं आहे.
भारत आता सामर्थ्यशाली देशांच्या यादीतून बाहेर पडल्यामुळे तो आता मध्यम स्तरातील देशांमध्ये गेला आहे, असं देखील या संस्थेनं म्हटलं आहे. आता पुन्हा एकदा या यादीत स्थान मिळवण्यासाठी भारताला २०३० ची वाट पाहावी लागणार असल्याचं दिसत आहे.
मात्र जागतिक पातळीवर भारताचा प्रभाव कमी झाला असला तरी आशिया खंडात भारताचा प्रभाव वाढला असल्याचं देखील या अहवालात दिसून आलं आहे.