रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या खटल्याप्रकरणी अटक केली आहे. अर्णबला त्याच्या वरळीच्या घरातून अटक करण्यात आली आहे. तिथून त्याला अलिबागला नेण्यात आलं आहे.
नक्की काय आहे अन्वय नाईक प्रकरण?
वास्तुविशारद असलेले अन्वय नाईक यांनी अर्णबवर काम करून देखील पैसे न दिल्याचा आरोप लावला होता, मात्र त्याकडे कुणी लक्ष दिलं नाही. त्यातून आलेल्या नैराश्यातून अन्वय नाईक यांनी अलिबागजवळील कावीर या गावी ५ मे २०१८ रोजी आत्महत्या केली होती. याबाबत अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी पत्र देखील लिहिलं होतं. अन्वय नाईक यांनी अर्णबच्या स्टुडिओचं काम करून देखील त्याचा ८३ लाख एवढा मोबदला न दिल्यामुळे त्यातून आलेल्या तणावामुळे अन्वय नाईक आणि त्यांची आई अशी दोघांनी आत्महत्या केली होती.
अन्वय नाईक यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी अनेक वेळा प्रयत्न केले होते, मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश येत नव्हतं. त्यांनी अनेक वेळा ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करून अर्णबला आणि सरकारला जाब विचारला होता. त्याचबरोबर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील याबाबत सप्टेंबर महिन्यात विधानसभेत दोषी लोकांवर कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं होतं.
मात्र अखेर अर्णबला अटक केल्यानंतर अन्वय नाईक आणि त्याच्या पत्नी अक्षता नाईक यांना न्याय मिळेल अशी चिन्हं दिसत आहेत.