कृषी कायद्याला देशभरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे हे दाखवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलने करण्यात येत आहेत. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बुलडाणा जिल्ह्यांमध्ये स्वाभिमानीने आंदोलन केले. केंद्रीय कृषी विधेयकांच्या विरोधात यापुढील आंदोलने दिल्लीत होतील, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. तसेच “कोणीही बाहुबलीने रस्त्यावर येऊन आंदोलन करुन दाखवावे,” असा इशारा राजू शेट्टी यांनी आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना दिला आहे.
कोल्हापूर-सांगली जिल्ह्याच्या हद्दीवरील अंकली पुलावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन केले. या ठिकाणी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त लावला असून, जयसिंगपूर पोलीस सर्वच ठिकाणी सतर्क आहेत. त्यामुळे अंकली-उदगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सांगलीमध्ये उसाला एकरकमी एफआरपी आणि मागील वर्षीची थकित एफआरपी मिळावी, केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे.
सोलापूर जिल्ह्यात राळेरास येथील बार्शी रस्त्यावरही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केलं. शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसदर (एफ.आर.पी) जाहीर करावा, अशी मागणी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. यासोबत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुलडाणा- अजिंठा महामार्गावर देऊळघाट येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रस्ता रोको करण्यात आला.
या रास्तारोकोमध्ये शेतकरी विरोधी कृषी कायदे सरकारने रद्द करावे,अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मग शेतकऱ्यांच्या उद्रेकाला केंद्रासह राज्य सरकारला सामोरे जावे लागेल , असा इशारा रविकांत तुपकरांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत दिला.
महत्वाच्या बातम्या – अर्णब प्रकरणावरून राजु शेट्टी भडकले! म्हणाले…