कोरोनाची येणारी दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी आज संवाद साधताना केले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची खबरदारी कायम ठेवण्याबाबत आज मुखमंत्र्यांनी जनतेसोबत संवाद साधला. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देऊन केली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे तसेच सोशल डिस्टंन्सिंग ठेवण्याबाबत जनतेला आवाहन केले.
तसेच दिवाळीत फटाके न वाजवणे, मास्क वापरणे, माझे कुटुंब माझी जबाबदारी, माजी सैनिक आणि मृत माजी सैनिकांच्या पत्नीसाठी योजना अशा काही महत्त्वाच्या विषयांवर संवाद साधला. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेमुळे कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यास मदत झाली आहे, डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा ही योजना राबवल्यास कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होईल असं उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी कायम ठेवली पाहिजे, त्याचबरोबर मास्क न लावल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते, त्यामुळे एक जबाबदार नागरिक बना असे आवाहन केले.
मुख्यमंत्री काय म्हणाले ?
अनलॉक प्रक्रियेनंतर दैनंदिन व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत, त्यासाठी कार्यपध्दती ठरवून दिली आहे. चित्रपटगृहे, नाट्य गृहे, व्यायामशाळा, हॉटेल्स सुरू झाली आहेत. त्यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुंबईत महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. लवकरच नियमित लोकल सेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.
कोरोनाच्या कठीण काळातही उद्योगांची सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्राने पहिल्याच टप्प्यात मॅग्नेटीक महाराष्ट्र २.० ची सुरुवात केली आहे. तसेच विविध कंपन्यांसोबत १७ हजर कोटींचे करार केले आहेत. कांजूरमार्गमधील मेट्रो कार शेडची जमीन मिठागराची आहे असं म्हणणाऱ्यांना तुम्ही मुंबई मेट्रो प्रोजेक्ट मध्ये मिठाचा खडा टाकत आहात असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी टीका करणाऱ्यांना दिले.
राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा करण्याच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन सुरू करण्यात याव्यात असे निर्देश मी दिले आहेत. त्या संबंधित सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने याची अंमलबजावणी होईल असेही ते म्हणाले.
लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन रोजगार मेळाव्यांतर्फे आणि महास्वयम वेब पोर्टल मार्फत १ लाख १५ हजार ९२८ बेरोजगारांना ऑक्टोबर अखेरपर्यंत रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला योग्य तो भाव मिळण्यासाठी पिकेल तेच विकेल या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
राज्यातील माजी सैनिक आणि वीर पत्नींना देण्यात येणाऱ्या निवासी मालमत्तेचा कर, घरपट्टी माफीच्या योजनेस मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असे नाव देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला विकासाच्या योजना केवळ कागदावरच न राहता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आपली भूमिका असून महिलांच्या समस्या संदर्भातील योजनांना गती देणे तसेच सध्याच्या योजनांतील अडचणी दूर करणे, याबाबत विशेष कक्ष उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री कार्यालयात सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या – हे म्हणजे ‘मी पुन्हा येईल’ सारखं झालं! डोनाल्ड ट्रम्प यांना ‘ह्या’ नेत्याचा टोला…
बायडन यांनी एवढ्या गोळ्या, इंजेक्शन टोचुन घेतलेत की ते १ वर्षापेक्षा जास्त जगणार नाहीत -कंगना