हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते असिफ बसरा यांनी गुरुवारी धर्मशाळा (हिमाचल प्रदेश) येथे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. असिफ ५३ वर्षाचे होते. या घटनेने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. असिफ यांनी १९९८ साली ‘वो’ या भयपट मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. नंतरच्या काळात ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘प्यार का सुपरहिट फॉर्म्युला’, ‘परझनीया’ या काही सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
‘क्रिश ३’, ‘फिरकी अली’, ‘एक विलन’ या सिनेमातल्या त्यांच्या भूमिका सुद्धा लक्षवेधी ठरल्या. तसेच ‘होस्टेज सीजन २’, ‘पाताललोक’ अशा काही वेबसिरीजमधून काही ठराविक वेळेच्या भूमिकेंना सुद्धा त्यांनी योग्य न्याय दिला. याप्रमाणेच काही गुजराती सिनेमातही त्यांनी आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली. ‘जब वी मेट’ या सिनेमात मुख्य भूमिकेत शाहिद कपूर आणि करिना कपूर खान यांच्यासोबत त्यांची चहावाल्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली आणि लक्षात देखील राहिली.
गेल्या काही महिन्यांपासून असिफ नैराश्यात होते. गेल्या पाच वर्षांपासून मॅग्लोडगंज इथं भाड्याच्या घरात त्यांच्या एका परदेशी मैत्रिणीसोबत राहत होते. गुरुवारी आपल्या कुत्र्याला फिरायला घेऊन गेले होते. घरी परतल्यावर कुत्र्याच्या पट्टयानं गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून असिफ यांच्याप्रती असणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पुढील तपास पोलिस करत आहेत.
मनोज वाजपेयीने असिफबद्दलच्या आपल्या भावना ट्विटरद्वारे व्यक्त केल्या आहेत.”असिफ बसरा यांच्या मृत्यूमुळे मला धक्का बसला आहे. लॉकडाऊनपूर्वी असिफसोबत शूटिंग केलं होतं. आणि ते त्यांना या सिनेमातून पाहू इच्छित होते.” असं मनोज वाजपेयी यांनी ट्विट केलं आहे.
नक्की वाचा- यमदूताला शांतीदुत करणारी तार…
न थांबणारा झंझावात “मिर्झापूर”