आयुष्यात प्रत्येकालाच येणारे सुख दुःख झेलत, अनेक आघात-अपघात पचवत, येणार्या संकटांना खंबीरपणे तोंड देत पुन्हा उभे राहावे लागते. आयुष्यात चढ-उतार हे ठरलेलेच असतात. अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा सामना करत आयुष्य जगावे लागते. फरक मात्र एवढंच की काही जण त्यातून खंबीरपणे मार्ग शोधतात आणि बाहेर पडतात तर काही जण त्यातच खचून जातात.
अपंग या शब्दाची ओळखच परिस्थितीतीशी झगडत, त्यावर मात करत हिंमतीने पुन्हा उभे राहणे अशी आहे. असंच आहे ती परिस्थिती स्वीकारून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे , आपल्या सर्वांनाच एक नवीन प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावचे रहिवासी असणारे श्रीपत जवरत. त्यांना लहानपणीच एका अपघातात आपला एक पाय गमवावा लागला. परंतु तरीही ते कितीही उंच असणाऱ्या झाडावर चढतात हे विशेष!
गेली ४० वर्षे श्रीपत हे झाडे साफ करून आपला उदरनिर्वाह करतात. या ४० वर्षात त्यांच्याकडून झाडावर चढताना कधीही चूक झाली नाहीये एवढ्या सफाईने ते झाडावर चढतात. त्यांना केवळ आसपासच्याच भागातून नाही तर अगदी जिल्ह्याच्या अनेक भागांमधून देखील झाडे साफ करण्यासाठी बोलवले जाते. श्रीपत यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदलाही मिळतो.
अपघात कसा झाला ?
सध्या श्रीपत यांनी वयाची साठी ओलांडली आहे वयोमानानुसार शरीर साथ देत नाही तरीदेखील त्यांचे हे काम सुरूच आहे. त्यांच्या झालेल्या अपघाताविषयी बोलताना ते म्हणतात, तो दिवस मला आजही आठवतो. तेव्हा गावांगावांमध्ये नुकतीच वीज येऊ लागली होती. त्याकरता वायर खेचण्याचं काम सुरू होतं. मी माझ्या काही मित्रांसोबत तेव्हा लपाछपी खेळत होतो. मला पहिल्यापासूनच झाडावर चढण्याची आवड असल्यानं मी विजेच्या खांबावर चढलो होतो, त्यावेळी विजेच्या तारांना माझा स्पर्श झाला सुरुवातीला विद्युत प्रवाह सुरू नव्हता, पण त्यानंतर अचानक प्रवाह सुरू झाला आणि जवळपास दोन तास मी तिथे खांबाला चिकटून होतो. सुदैवाने मी वाचलो, त्यावेळी मला बांबूच्या सहाय्यानं बाजूला करून जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता आणि मी माझा एक पाय गमावला होता.
एबीपी माझाला त्या दिवसाबद्दल माहिती देताना सारा घटनाक्रम डोळ्यासमोरून येऊन गेला, हे सगळ सांगताना त्यांचा आवाजही काहीसा घोगरा झाला होता, वयोमानानुसार त्यांच्या बोलण्यातही थकवा जाणवत होता. असे असले तरी काही काळानंतर मी झाडावर चढू शकतो यावर सगळ्यांना विश्वास बसला आणि आसपासच्या परिसरातून तसेच अगदी लांबच्या ठिकाणाहूनही कामासाठी बोलावणे येऊ लागले. मी गेली ४० वर्षे, कितीही उंच आणि कोणत्याही झाडावर अगदी बिनधास्तपणे चढून झाडे साफ करतो, असेही ते म्हणाले.
श्रीपतचा अपघात झाला तेव्हा आई बाबा आणि आम्ही सारे शेतात होतो, अपघातानंतर काही वर्षाने त्याला झाडावर चढण्याकरता बोलावणे येऊ लागले, त्यावेळी आम्हाला हे माहितही नव्हते. हे काम करू नकोस असे बजावूनही त्याने ते ऐकले नाही. अशी प्रतिक्रिया श्रीपत यांचे मोठे भाऊ विठ्ठल जवरत यांनी एबीपी माझाला दिली.
आमचे कुटुंब मोठे आहे, आणि त्यात ते अपंग असल्याने त्यांना कोणी मुलगी दिली नाही, पण तरीही ते आम्हाला कधीच ओझ वाटले नाही. त्यांचे ते काम करतात आणि त्यांच्या कमाईचा हिस्सा ही ते घरात देतात, ते अपंग असले तरीही तसे वागत नाहीत. ज्या गोष्टी त्यांना शक्य होत नाहीत त्यात आम्ही त्यांना मदत करतो. त्यांचे पुतणे ही त्यांना आपले मानतात आणि ते ही पुतण्यांशी आपुलकीने वागतात. असे श्रीपत यांच्या वहिनी सविता जवरत यांनी एबीपी माझाला सांगितले.
श्रीपत यांच्या विषयी गावातील लोकांसोबत चर्चा केली. ” माझं वय ४० आहे, श्रीपतला मी लहानपनापासून ओळखतो, हा माणूस रोज मेहनत करतो, याला खूप लांबून लोक कामासाठी बोलावतात. सद्ध्या वयानुसार त्यांना काही अडचणी येतात परंतु तरीही तो थांबण्याचे नाव घेत नाही. जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत मी झाडांवर चढत राहणार अशी प्रतिक्रिया श्रीपत देतात.
आज ४० वर्षे मी यांना पाहतो आहे पण कधीही या माणसाने परिस्थितीचे भांडवल केलेले मी पाहिले नाही. असे तुरळ गावचे पोलीस पाटील आणि नागरिक संजय ओकटे यांनी सांगितले. गावातील प्रत्येक जण श्रीपत यांच्या जिद्दीचे कौतुक करतात.
वाचा – दोन्हीही हात नसताना चक्क ‘पायाने’ विमान उडवणाऱ्या महिला पायलट जेसिका काॅक्स