आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे तसे फार कमी आहेत, पण त्यांनी बलवलेले जितके काही सिनेमे आहेत त्या प्रत्येक सिनेमाने आपापली एक वेगळी छाप सोडली आहे. २० व्या शतकाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘लगान’ आपल्याला नक्कीचं आठवत असेल आणि तुम्ही पाहिलाही असेल. २००४ मधला आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला “स्वदेस” हा सिनेमा काही प्रेक्षकांना अपरिचित असू शकतो. (आशुतोष गोवारीकर यांचा एक वेगळा चाहतावर्ग वगळता) नव्वदच्या दशकातलं बॉलिवूडमधलं आघाडीचं नाव किंगखान म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका शाहरुख. रोमान्स असो किंवा ड्रामा किंवा मग थ्रील असे अनेक सिनेमे त्यानी केले. ते सर्व सिनेमे बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले. आजही कधी शाहरुखचे सिनेमे टीव्हीवर लागले की, आपण तितक्याच आवडीने ते सिनेमे पाहतो. शाहरुखची बोलण्याची स्टाइल असो, त्याचा पेहराव असो, त्याची संवादफेक असो किंवा मग त्याच हसणं असं बरंच काही करताना त्याच्या सिनेमांमधून शाहरुख खान आपल्याला दिसतो. आणि आवडतो सुद्धा. या साऱ्या गोष्टी झुगारून स्वदेसमधला मोहन भार्गव हे पात्र या सर्वांच्या अगदीच उलट आहे आणि ते साकारलं आहे शाहारुखने हे त्याहूनही निराळचं, एक उत्तम कलाकार म्हणून त्याची ओळख मोहन भार्गव या पात्रामुळं नव्यानं झाली.
लेखाच्या शीर्षकात सांगितल्याप्रमाणे ‘स्वदेस’ हा आपल्या माणसाने, आपल्या माणसांसाठी बनवलेला आपल्या मातीतला सिनेमा आहे. अमेरिकेतील ‘नासा’ या संस्थेत मोहन भार्गव एका चांगल्या पोस्टवर कार्यरत आहे. चांगला पगार, उत्तम राहणं-खाणं, झोपणं आणि काम. इतक्या पुरतच मोहनच जीवन सीमित आहे. तसा मोहन हा मूळचा भारतीय आहे. पण काही कारणांमुळे तो अमेरिकेत सेटल झाला. त्याच्या पडत्याकाळात कावेरीअम्मा नावाच्या एका बाईंनी त्याचा काहीकाळ सांभाळ केला होता. कावेरीअम्माला भारतातून अमेरिकेत घेऊन येण्यासाठी मोहन दिल्लीत येतो. तिथं कावेरीअम्मा नसल्याचं त्याला समजत. यामुळे कावेरीअम्माचा शोध घेत मोहन चरणपूर नावाच्या एका गावात येतो. अशी साधारणतः सिनेमाची कथा आहे.
विकसित देशांच्या यादीत अमेरिका हा देश गणला जातो. तिथल्या माणसांना अनेक सोईसुविधा सरकारकडून दिल्या जातात. म्हणजेच पाणी, वीज, घर अशा मूलभूत सोयीसुविधा तिथल्या माणसांना दिल्या जातात. चांगले रस्ते, उत्तम आणि दर्जेदार पद्धतीच शिक्षण असं बरंच काही तिथल्या माणसांना मिळतं. यामुळेच अमेरिका वा इतर प्रांतातून एखाद्या व्यक्ती ज्यावेळी भारताल्या एखाद्या खेडेगावात कुणाकडे तरी येते, तेव्हा तिथल्या माणसांना त्या व्यक्तीचं भलतच अप्रूप वाटतं. त्याची फडफड बोलणारी इंग्रजी भाषा त्यांना फार काही समजत नसली, तरी एक खूप मोठं काहीतरी आहे. असा समज मात्र त्यांच्यामध्ये निर्माण करते. तिथल्या लोकांची एक वेगळी जीवनशैली आहे. त्यांच लाईफस्टाईल हे पूर्णतः एक वेगळ्या स्वरूपाचा आहे. त्याला ‘कल्चर’ म्हटलं तरी वावगं वाटू नये.
भारताचा जर विचार केला तर, विकसनशील देशांच्या यादीत भारत देशाचा समावेश होतो. शिक्षणाचा अभाव, जातीभेद/वर्णभेद, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न भारतीय माणसांच्यासमोर उभे ठाकलेले आहेत. पाणी, वीज, या मूलभूत गोष्टींपासून कित्येक गावं वंचित आहेत. अशा अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचं काम आशुतोष गोवारीकर यांनी त्यांच्या स्वदेस सिनेमाद्वारे प्रेक्षकांसमोर मांडलं आहे.
‘चरणपूर’ नावाच्या गावातली माणसं अतरंगी रंगाढगांची आणि आपली संस्कृती-परंपरा जपणारी आहेत. प्रामुख्याने दोन पात्रांचा उल्लेख करणं महत्त्वाचं वाटतं. एक म्हणजे मेलाराम आणि पोस्टमास्तर तशी दोन्ही पात्र अत्यंत बोलक्या स्वरूपाची आहेत. मेलारामला स्वतःचा असा एक ढाबा सुरू करायचा आहे. त्याच्या हाताला एक वेगळीच जादू आहे. मेलाराम हा दलित समुदायाचा असल्यामुळं त्याच्या हातचं खाणं म्हणजे भयंकर पाप वगैरे मानणारी माणसं चरणपूरमध्ये आहेत. पोस्टमास्तर नावाचं पात्र शरीरयष्टीनं भरभक्कम दिसत असलं तरी, मनानं मात्र सौम्य स्वरूपाच आहे .सबंध गावात सरकारी नोकरी करणारा हा एकमेव व्यक्ती आपल्याला दिसतो. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसून ती गोष्ट जाणून घेण्याचं भलतच कसब फक्त आणि फक्त पोस्टमास्तरलाचं जमू शकतं. या दोघांसारखेच अजून बरीच छोटी-छोटी पात्र सिनेमामध्ये आपल्याला दिसतात. त्या प्रत्येक पात्रच एक स्वतंत्र बॅकग्राऊंड आशुतोष गोवारीकर यांनी उत्तम प्रकारे आपल्याला दाखवल आहे.
गीता(गायत्री जोशी) शाळेत शिक्षिका म्हणून काम करते आहे. गावात शिक्षणाचा अभाव असल्यामुळ शिक्षणाच महत्त्व आणि प्रबोधन करण्याच काम गीता करतेय, अश्या देशी रंगांनी आणि पात्रांनी भरलेला हा सिनेमा आपल्या भारताची ओळख करुन देतो.
वाचा – आशियाचा अकॅडमी अवॉर्ड समजला जाणारा “यंग सिनेमा अवॉर्ड” मराठमोळ्या अक्षय इंडीकर यांना…