पुणे | महाविकासआघाडी सरकारकडून विरोधी पक्षाला आणखीन एक दणका देण्यात आला आहे. भाजप सरकारच्या काळात अभ्यासक्रम निर्मितीसाठी नियुक्त केलेल्या विषय समित्या आणि अभ्यासगट बरखास्त करण्याचा निर्णय बालभारतीने घेतला आहे. बालभारतीचे विद्यमान संचालक दिनकर पाटील यांनी या निर्णयाचे पत्रक संबंधित सदस्यांना देऊ केलं आहे.
भाजप सरकार सत्तेवर असताना माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अभ्यासक्रम निर्मितीसाठी पूर्वापार चालत आलेल्या अभ्यास गट आणि विषय समित्या स्थापन केल्या होत्या. मात्र या समित्यांमध्ये तत्कालिन भाजप सरकारसंबंधित सदस्यांची नेमणूक करण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
म्हणूनच बालभारतीने अभ्यासक्रम निर्मितीसाठीच्या समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नव्याने नियुक्त होणार्या समितीमध्ये विद्यमान सरकारच्य संबंधित सदस्यांची नेमणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान भाजप सरकारने सत्तेत असताना बालभारतीच्या पूर्वापार चालत आलेल्या अभ्यासमंडळाचे नाव बदलून ‘अभ्यास समित्या आणि विषय गट’ असे केले होते.