मुंबई | कायम आक्रमक भूमिका घेणारी मनसे सतत नवीन मुद्दे उपस्थित करत असते. ३१ डिसेंबरला राज्य सरकारनं लागू केलेल्या संचारबंदी विरोधात मनसेनं आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ तारखेला राज्य सरकारने संचार बंदी लागू केली आहे. मात्र मनसेने सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत, नवीन वर्षाचा आनंद सर्वांना साजरा करता आला पाहीजे, या कारणावरून ‘संचार बंदी नको’ अशी मागणी मनसेनं सरकारकडे केली आहे.
सरकारने नवीन वर्षाच्या पार्श्ववभूमीवर हे नियम थोडे शिथिल करावेत, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू आणि नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करू असा इशाराही मनसेने दिला आहे.
दिवसा एकत्र फिरण्यास बंदी नाही, म्हणजे दिवसा फिरल्यावरती कोरोना होत नाही आणि रात्री एकत्र आल्यावरच कोरोना होतो, असा नवा शोध सरकारने लावला आहे की काय? असा सवालही मनसेद्वारे उपस्थित केला आहे.
दरम्यान, ब्रिटन मध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्यामुळे खबरदारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी लागू केली आहे. यानुसार राज्यात २२ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी असणार आहे