कडाक्याच्या थंडीत कृषी कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहेत. नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पण मोदी सरकार सातत्याने नवीन कृषि कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याचं सांगत आहेत. भाजप सरकारच्या या ठाम भूमिकेचे परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत.
अकाली दलानंतर राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने एनडीएची साथ सोडली आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे (आरएलपी) संयोजक हनुमान बेनीवाल यांनी एनडीएमधून बाहेर पडत असल्याची शनिवारी घोषणा केली. शेतकऱ्यांना विरोधात करणाऱ्यांना पाठिंबा दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
आरएलपी हा राजस्थानमधील भाजपचा मोठा मित्रपक्ष आहे. त्यामुळे आरएलपीने पाठिंबा काढून घेतल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नवीन कृषी कायदे मागे घ्यायला तयार नाही. त्यांच्या या ताठर भूमिकेमुळे गेल्या चार महिन्यात चार मित्र पक्षांनी साथ सोडली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राजकीय समीकरणे बदलणार हे निश्चित झालं आहे.