अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणानंतर एनबीएने (News Broadcasters Association) रिपब्लिक टीव्हीचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी दूरचित्रवाणी वाहिन्यांची देशातील शिखर संस्था असलेल्या ‘आयबीएफ’कडे (Indian Broadcasting Federation) केली आहे.
या मागणीनंतर रिपब्लिक टीव्हीला फटका बसण्याची शक्यता आहे. टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरू असताना अर्णब गोस्वामी व बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियातून व्हायरल झाली. या चॅटमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
यानंतर “दासगुप्ता व गोस्वामी यांच्यातील हजारो व्हॉट्सअॅप चॅट बघून धक्काच बसला आहे. या व्हॉट्सअॅप चॅटमधून स्पष्ट दिसतंय की गोस्वामी व दासगुप्ता यांनी हातमिळवणी केली होती. रिपब्लिक टीव्हीची प्रेक्षक संख्या वाढवून दाखवण्यासाठी रेटिंगमध्ये हेराफेरी करण्यात आली. रिपब्लिक टीव्हीच्या फायद्यासाठी इतर वाहिन्यांचं रेटिंग कमी करण्यात आलं. त्याच्यासाठी दोघांमध्ये हातमिळवणी होती,” असे एनबीएने म्हणले आहे.
तसेच या चॅट प्रकरणानंतर “फक्त रेटिंगमध्ये हेराफेरीच नाही, तर सत्तेतही हस्तक्षेप करण्यात आल्याचं व्हॉट्सअॅप चॅटमधून समोर आलं आहे. दोघांमधील व्हॉट्सअॅप संवादात सचिवांच्या नियुक्त्या, मंत्रिमंडळातील फेरबदल, पीएमओपर्यंत लागेबांधे आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या कामाबद्दलही उल्लेख करण्यात आलेला आहे. मागील चार वर्षांपासून एनबीएकडून करण्यात येत असलेल्या आरोपांनाच दुजोरा देतं. बार्कच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लागेबांधे लावून एनबीए सदस्य नसलेल्या वाहिनीकडून रेटिंगमध्ये हेराफेरी केली जात आहे. त्यामुळे रिपब्लिक टीव्हीचे रेटिंग न्यायालयाचा निकाल येईपर्यंत थांबवण्यात यावं” अशी सूचना एनबीएकडून बार्कला करण्यात आली आहे.
दरम्यान चॅट प्रकरणाचे सविस्तर पत्रक एनबीएकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. रिपब्लिक वृत्तवाहिन्यांवर कारवाई करण्याच्या मागणीवर एनबीएने जोर दिला आहे. तसेच हि सगळी गोस्वामी व पार्थो यांची मिलीभगत आहे. असा आरोप देखील एनबीएने केला आहे.