“उच्चरांना अवघड वाटणारा शब्द हा बदलावा वाटतो. तो बदल बहुजनांकडूनच होतो. क्लिष्टता कोडिंग हे अधिमान्यता राखण्यासाठीच अस्तित्वात असते. सॉफ्टवेअर कोडिंग काय वेगळे, ओपन सोर्सचा हट्ट असतो? ती ही भाषाच आहे” “भाषा ही वैयक्तिक मालकी नसून ती समूहाची मालकी असते” ह्या आवडलेल्या ओळी आहेत ‘पटेली’ या नवीनच आलेल्या कादंबरी मधल्या, आणि याचा अर्थ पटेलीच्या भाषेवरून प्रत्यक्षात येतो, लोक जसे बोलतात तशी पटेलीची भाषा आहे.
मुंबईतील चाळ संस्कृतीत राहणाऱ्या ज्याचे वडील पूर्वी गिरणी कामगार होते, अश्या बहुजन जातीतील, आयटीत काम करणाऱ्या पण साहित्याची आवड असणाऱ्या नायकाची आणि त्याच्या आयुष्यात आणि कादंबरीमध्ये महत्वाची भूमिका असणाऱ्या स्त्रियांची ही कथा आहे. पात्रांची नावे इंटरेस्टींग आहेत. ती कथेत बरेच काही सुचवतात.
पटेलीच फेसबुक टिझर आणि काही फेसबुकवरचे प्रोमोशन वाचूनच मागवली होती, प्रकाशनानंतरच मागवली पण आल्यावर सलग आणि पटकन वाचून झाली, ज्या टप्प्यावर कथेचा नवीन भाग किंवा शेवट सुरू होता त्यावेळी कामांमुळे वाचन पुढं ढकल गेल पण ते जमून आलं दोन भागांमध्ये वाचल्यासारखं जसं कादंबरीच कथानक आहे तस. “तिला सगळ्यांचे बाप बनायचेय. जगात दुःख सोडवायचेय.बुद्ध बनायचेय. बाईने दुःख सोडवू नये. ती नेहमी मुक्त असते.केवळ बाईचं मुक्त होऊ शकते. दुःख सोडवण्याच्या नादात त्या मुक्त व्हायच्या विसरून जातात.मग घोटाळा” हे वाचलं अन पुस्तक बाजूला ठेऊन शांत बसले, विचार केला, काहीतरी जवळच वाटलं अस अनेकदा पटेली वाचताना झालं. खरंतर कोणतीही कादंबरी वाचताना आपण अनेकदा पात्र, कथा त्यातली थेअरी याच्याशी रिलेट करतोच. ही तर समकालीन तरुण लेखकाची कादंबरी असल्यामुळं शहरात राहणारी तरुण वाचक म्हणून अनेक गोष्टी रिलेट झाल्या. गाव की शहर यात अडकलेली आजकालची माझी पिढी. आणि यात झुकत माप जात ते शहरालाच आणि शहरात विशेषतः मुंबई सारख्या महानगरात राहताना तिथलं जगणं, समूह, सार्वजनिक जागा, स्त्री-पुरुषांचे नातेसंबंध, याच आताच्या काळातलं उत्तम चित्र लेखकानं रेखाटलं आहे.मुंबईत न राहणाऱ्या पण शहरात राहणाऱ्या किंवा गावातल्या ही तरुण लोकांना नक्कीच आवडणारी कादंबरी आहे. सगळे उपभोग सहज उपलब्ध असताना, पटेली करून ही जगता येत असताना, स्वतःच्या आयुष्यात आणि आजूबाजूला ही उलथापालथ चाललेली असताना ही स्वतःच्या आयुष्याला अर्थ देण्याची मानवाची आस धडपड विशेषतः सध्याच्या तरुण पिढीतली, ठळकपणे जाणवते. एकूण सध्याच्या चंगळवादी व नवं उदारमतवादी काळात अडकून जे व्यक्तिगत तुटलेपण तरुण पिढी अनुभवत आहे हे नायक आणि त्याच्या सोबतच्या पात्रांमधून दिसते. “नात्याचं कालवण करायचं तर फक्त दोन माणसं भिजत घालून उपयोग नाय, मसाले खोटे असतात. मसाले हे नात्यात असलेल्या बाकीच्या गोष्टींची बेरीज, कालवणाला मसाल्याची चव नको. कालवण कश्याच बनत त्याची चव असायला हवी. मसाला पैसा, गाडी, घरं बरा चेहरा…” ज्याचं कालवण त्याच भाजीची चव यायला हवी मसाल्यांची नको या रुपकाने काही जवळच आठवलं. काही गोष्टींची जाणीव-नेणिवेच्या पातळ्यांवर किती सवय झालेली असते, वेगळी दृष्टी मिळाली की खडबडून जाग झाल्यासारखं वाटत तस एक-दोन प्रसंग वाचताना झालं, वेगळा दृष्टिकोन मिळाला. रंग दे बसंती आणि पार्च हे दोन्ही सिनेमे मला आवडलेले पण त्याबद्दल जे मत लेखक सांगतो ते सनसणीत आहे, त्यासंबंधीचा विचार फिल्म आवडल्यावर नव्हता आला. रंग दे बसंती बद्दल अस की “श्रीमंताच देशप्रेम एअर फोर्स असते, पोट भरलेले मधले होतात. पोट न भरलेले मूलतत्ववादी होतात. काय करणार सर्व दुनिया पेट पे चलती है! ” हे किती वास्तववादी वर्णन आहे. “पार्चमध्ये दृश्यमूल्य व निर्मितीमुल्य उत्तम आहेच पण ते रोमॅंटिक आहे. उच्च मध्यमवर्गीय रोमॅंटिक कल्पना. दिग्दर्शकाने तिच्या डोक्यातून मुक्ततेच्या कल्पना रंगवल्या वा जास्तीत जास्त मुक्त होण्यास सुचवले असेल पण त्या भागातले सत्य झोपडीत जाळले जाते वाळू पुरले जाते अध्यात्मिक योनीत लपवले जातेय.” हे वाचून अनेक फिल्म ज्या फिल्म म्हणून उत्तम वाटलेल्या त्यांबद्दलच्या वास्तव परिस्थितीचा विचार मनात आला. चाळ संस्कृती, सार्वजनिक संडास, सार्वजनिक नळ, एकत्र सण साजरे करणं हे समूह पातळीवरच जगणं आनंद आणि त्रास देणार, शेवट सगळ्यांच भलं होण्याचा विचार हे वाचून भारी वाटत. एन्जॉय करता येत. आजकालच्या तरुण मुला-मुलींसाठी फेसबुक किती जवळच आणि आयुष्यावर परिणाम करणार माध्यम बनलं आहे हे ठळकपणे दिसत. मुंबईमधील ठिकाण, खाणं, सार्वजनिक जागा आणि त्यांचे माणसांच्या जगण्याशी बांधलेले नाते, चाळ, यांची वर्णन ते शेती, भाषा, सिनेमा सामाजिक काम, गिरणी कामगार, संघटना, पोलिटिकल पार्टी, साहित्य, भाषा यांवरची पोलिटिकल टिप्पणी आणि नायकाचे स्वतःच्या शोधावरचे लिखाण ही यात वाचायला मिळते. शेवटी विकासाच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पानं पुसणाऱ्या व्यवस्थेबद्दल लेखक लिहतो. एकूण कादंबरीचा प्रवास, कथानक आणि तत्वज्ञान चांगलं जमलं आहे. भाषाशैली वाचणाऱ्यांना आकर्षित करते. प्रस्थापित सौंदर्यशास्त्राला आव्हान देणारी भाषा आणि मांडणी आहे. आवडलेल्या ओळींपैकी काही ओळींनी शेवट करतीये, कादंबरी नक्की वाचा “त्यानंतर आपण एकमेकांना वगळले. मी माझ्यासाठी तू तिच्यासाठी. तू तिच्या प्रेमाखातर. ती डावात नाही. जगाचा डाव तू. तू डाव स्वतःचा.गझल तू इस्पिक राणी.” –
प्रिया रूपाली सुभाष