वाशिम: सध्या देशभरात वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाची कमतरता निर्माण झाल्याने अनेक राज्यांवर वीज कपातीची टांगती तलवार आहे. तसेच येणाऱ्या काळात पारंपारिक साधनसंपत्ती संपुष्टात येणार असल्याने वीज निर्मितीसाठी नवीन पर्याय शोधणे गरजेचे झाले आहे.
देशभरात सूर्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी सौर पॅनल बसवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. तसेच हवेच्या मदतीने पवनचक्क्या फिरवून देखील वीज तयार केली जात आहे. असाच एक भन्नाट शोध वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात राहणाऱ्या सत्यनारायण भड यांनी लावला आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या जड वाहनांच्या वजनाचा वापर करून वीज तयार करण्याचे तंत्र त्यांनी शोधून काढलं आहे.
आपण पाहतो की रस्त्यावरून दररोज शेकडो टन वजन असणारी अवजड वाहने प्रवास करत असतात. रस्त्यावरच्या एखाद्या जागेचा विचार केला, तर त्या ठिकाणी वाहनाच्या वजनामुळे प्रचंड दबाव पडतो आणि ते वाहन पुढे निघून गेल्यानंतर दबाव शून्य होतो. दबावातील या फरकामुळे कंपन तयार होतात.
यांचा वापर करून विशिष्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने वीज निर्माण केली जाऊ शकते, हे सत्यनारायण भड यांनी दाखवून दिलं आहे. सकाळने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
भड हे शासकीय तंत्रनिकेतन येथून विद्युत तंत्रज्ञ म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांनी वाहनांच्या प्रचंड वजनाच्या मदतीने वीज निर्माण केली जाऊ शकते, हे शोधून काढलं आहे. या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिक त्यांनी दिल्लीत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींना देखील करून दाखवली आहेत.
जर हे तंत्रज्ञान जर यशस्वी झालं आणि त्याचा वापर प्रत्यक्ष रस्त्यांवर करण्यात आला, तर त्यातून वीज निर्मिती करता येऊ शकते. निदान या विजेच्या मदतीने रस्त्यावर असणाऱ्या दिव्यांना तरी वीज पुरवठा केला जाऊ शकतो.