काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर नावांच्या चुका, पत्त्याच्या चुका अशा अनेक चुका झाल्या. त्यानंतर ज्या दिवशी परीक्षा होती. त्याच्या आदल्या दिवशी रात्री उशिरा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द करण्यात येत आहे अशी घोषणा केली. आता पुन्हा एकदा नव्याने होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळत असून, या भरती प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे
आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड पदांसाठीच्या परीक्षा २४ आणि ३१ ऑक्टोबरला होणार असल्याचं आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे. परंतु यामध्ये पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाल्याच चित्र आहे. एकाच तारखेला २ परीक्षा, वेगवेगळ्या दोन जिल्ह्यांमध्ये ठेवलेल्या आहेत. यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. एकाच दिवशी दोन वेगळ्या ठिकाणी परीक्षा कशा द्यायच्या हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
या भरती प्रक्रियेवर विद्यार्थ्यांकडून संतापजनक प्रतिक्रिया समोर येत असून, आरोग्य विभागाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून जोर धरत आहे. दोन दिवसांमध्ये सरकारचं याबाबत स्पष्टीकरण आलं नाही किंवा ठोस निर्णय आला नाही, तर आंदोलन करणार असल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.