राज्यातील महाविद्यालये उद्या म्हणजेच २० ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने, राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परंतु जरी महाविद्यालये सुरू होत असली, तरी विद्यार्थ्यांना मात्र नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
यात सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे विद्यार्थी पालक आणि महाविद्यालयाचे कर्मचारी यांचं दोन्ही डोसचे लसीकरण पूर्ण झालेलं असावं. जर विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नसेल, तर त्या विद्यार्थ्याला ऑनलाईन लेक्चरच्या पर्यायाचा अवलंब करावा लागेल. एखाद्या विद्यार्थ्यास कोरोनासदृश्य लक्षणं दिसल्यास त्याला महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.
महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी मास्कचा वापर करावा. तसेच ६ ते ७ फुट सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसणार आहे. एक बेंचसोडून एक विद्यार्थी असं वर्गामध्ये बसवलं जाणार आहे. राज्य सरकारने जरी ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने विद्यापीठ, महाविद्यालये सुरू करण्याच जाहीर केलं असलं, तरी तेथील परिस्थिती पाहून ते सुरू करायचे का नाहीत? याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.
तसेच कंटेनमेंट झोनमध्ये राहणारे कर्मचारी आणि विद्यार्थी यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये, अशी एक महत्त्वपूर्ण अटही या नियमांमध्ये घालण्यात आली आहे.