एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संप आता चिघळताना दिसत आहे. अजूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र आता एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
कोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेत कामावर येण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांकडून संप चालू आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
या पार्श्वभूमीवर अनिल परब पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, “काही एसटी कामगार संघटनांकडून संपाच्या नोटीसा आल्या होत्या. त्यानंतर आम्ही हाय कोर्टात गेलो आणि कोर्टाच्या आदेशानंतरही संप चालू असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर कोर्टाने आम्हाला अवमान याचिका दाखल करण्यासंदर्भात सूचना केली आहे.”
त्यामुळे राज्य सरकार उद्या (10 नोव्हेंबर) सकाळी दहा वाजता कोर्टात एसटी कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे. अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. त्यामुळे या याचिकेवर आता हायकोर्टाकडून काय निकाल दिला जातोय, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.