भारतीय लष्कराचे जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर आतापर्यंत झालेल्या विमान आणि हेलिकॉप्टर्स अपघातांच्या घटनांचे पुन्हा एकदा स्मरण झाले आहे.
आतापर्यंत माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी, काँग्रेसचे नेते संजय गांधी, ज्योतिराज सिंधिया याचे वडील स्वर्गीय माधवराव शिंदे, जी.एम.सी. बालयोगी, एस. मोहन, कुमारमंगलम, उद्योजक ओ.पी. जिंदल आणि अरुणाचल प्रदेशचे दोरजी खांडू या बड्या नेत्यांसह लेफ्टनंट जनरल दौलत सिंग यांचा हेलिकॉप्टर आणि विमान अपघातात मृत्यू झाला आहे.
२३ नोव्हेंबर १९६३ मध्ये जम्मू-कश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान क्रॅश झाले होते. यामध्ये हवाई दलाच्या ६ बड्या अधिकार्यांचा मृत्यू झाला होता. यामध्ये लेफ्टनंट जनरल दौलत सिंह, लेफ्टनंट जनरल विक्रम सिंह आणि एअर व्हाईस मार्शल अरलिक पिंटो यांचा समावेश होता.
२३ जून १९८० साली देखील अशीच एक मोठी दुर्घटना घडली होती. इंदिरा गांधी यांचे सुपुत्र संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता.
३० सप्टेंबर २००१ रोजी उत्तरप्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात काँग्रसेचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता तर 3 मार्च २००२ मध्ये लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष जी.एम.सी. बालयोगी यांच्या बेल २०६ हेलिकॉप्टरला अपघात होऊन त्यांचा देखील जागीच मृत्यू झाला होता.
सप्टेंबर २००४साली पवन हंस या हेलिकॉप्टरमधून गुवाहाटीहून शिलाँगला जात असताना झालेल्या अपघातात माजी केंद्रीय मंत्री सी. संगमा यांचे निधन झाले होते. 3 सप्टेंबर २००९ मध्ये आंध्रचे माजी मुख्यमंत्री वाय.एस.चंद्रशेखर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते. अपघातानंतर त्यांचा मृतदेह हा एक दिवसानंतर सापडला होता.