राज्यात गेल्या ५४ दिवसांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. याबाबत आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्ष अजय गुजर यांनी या संपातून आता माघार घेत आहोत, असे जाहीर केले आहे.
काल रात्री परिवहनमंत्री अनिल परब आणि कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटना यांच्यात बैठक पार पडली होती. तब्ब्ल ५ तासांसाठी ही बैठक सुरु होती.
त्यामध्ये संपातून माघार घेऊन कामावर हजार राहण्याबाबत निर्णय घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे.
एकीकडे अजय गुजर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संप मागे घेण्याची घोषणा केली असताना दुसरीकडे विलगीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही अशी भूमिका ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी मांडली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना अजय गुजर यांनी म्हटले आहे की आम्ही देखील विलगीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहोत. मात्र ही मागणी न्यायालयात प्रविष्ट आहे. या संदर्भात तारखा पडत आहेत.
५४ दिवसांपासून कर्मचारी आंदोलन करत आहेत त्यामुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुळेच आम्ही माघार घेतली आहे.
ऍड. गुणरत्न सदावर्ते हे हे आमचे वकील आहेत. जर त्यांना आमची भूमिका मान्य नसेल, त्यांना आमची केस लढायची नसेल तर आम्ही दुसरा वकील बघू असं देखील अजय गुजर यांनी स्पष्ट केलं आहे.
आता अजय गुजर यांनी आव्हान केलं आहे की कर्मचाऱ्यांनी २२ डिसेंबरपर्यंत कामावर रुजू व्हावं. मुंबईबाहेरचे कामगार, जे मुंबईत आंदोलनासाठी आले आहेत त्यांना कामावर रुजू होण्यासाठी अतिरिक्त दोन दिवस देण्यात आले आहेत.