देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच, महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असून यामुळे आरोग्य प्रशासनावर मोठा ताण निर्माण होत आहे. दरम्यान, राज्यातले कोरोनाचे सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण पुण्यात असून यातील ओमिक्रॉनचेही सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने पुण्यात कोविडमुक्त गाव अभियान राबविले होते. या अभियानाचा फायदा होऊन गाव कोविडमुक्त झाले होते. दरम्यान, पुणे विभागातही याची अंमलबजावणी व्हावी आणि या अभियानाच्या माध्यमातून आपले गाव कोविडमुक्त व्हावे. यासाठी ग्रामस्थांनीदेखील यात सहभाग घेण्याचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविडमुक्त गाव अभियानाचे कौतुक करत ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला जि. प. अध्यक्ष निर्मला पानसरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद इत्यादींनी हजेरी लावली होती.
पुण्यामध्ये राबविलेला हा उपक्रम यशस्वी ठरल्याने तो राज्यस्तरावर राबविण्याबाबत मंत्रिमंडळात माहिती देणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकार वेगवेगळे पर्याय शोधत आहे. म राज्यात निर्बंध देखील लावण्यात येत असून, लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे.