माझा आज्जा, नाना वारकरी व्हता. अशिक्षित. मुंबईत मिलमध्ये हमाली केली. ल्हितावाचता येत नव्हतं, पन तुकारामगाथा तोंडपाठ व्हती. एक म्हैन्याचा पगार खर्चून गाथा घेतलीवती. ती अजून हाय माझ्याकडं. तर, मला कळायला लागल्यापास्नं मी एक बघायचो, त्याच्या ट्रंकेत छोट्या-छोट्या डब्या,थैल्या असायच्या.
आज्जा वर्षभर त्यात नाणी साठवून ठेवायचा. दहा पैशे, चार आने, आठ आने, रूपया, काही नोटा असायच्या, त्यात सतत भर घालत असायचा. आषाढीची पालखी निघंस्तोवर त्या डब्या-थैल्या गच्च भरलेल्या असायच्या पैशांनी.
आज्जा रूबाबात वारीला निघायचा. बेभान होऊन ग्यानबा-तुकाराम च्या गजरात नाचत-नाचत कधी पंढरीला पोचला कळायचंबी नाय.
…पंढरीला पोचल्यावर मात्र इठोबाच्या दर्शनाची लै आस नसायची त्याला.. पंढरीची माती कपाळाला लावून, कळसाचं दर्शन घिवून, समोर यिल त्या वारकर्याच्या पाया पडत थेट चंद्रभागेच्या वाळवंटात पोचायचा.
तिथं गोरगरीब, भुकेले भिकारी, महारोगी बसलेले असायचे तिथं जायचा. आनि त्याच्या डबीतला आन् थैल्यांमधला सगळा खजिना हळूहळू वाटायला सुरूवात करायचा..काहीजनांना खायला घेऊन द्यायचा..
सगळे तृप्त होऊन हसले की गडी खुश ! म्हनायचा, “चलंय दिनकर, किरन्या चल, झाली वारी.” आमी म्हनायचो, “दर्शन?” म्हनायचा, “या घिवून. जा.” आन् तिथंच त्या गोरगरीबांच्यात सावली बघून धोतर तोंडावर घिवून सुखात झोपी जायचा !!
गाडगेबाबांशी नाळ जोडनारं हाय का नाय ह्ये भावांनो? जवानीत आज्ज्यानं गाडगेबाबांची किर्तनं ऐकली व्हती.. त्याचा प्रभाव जानवायचा प्रत्येक कृतीत..
गाडगेबाबा म्हनायचे,”संत तुकाराम माझा गुरू. माझा कुनी शिष्य नाय.” पन गाडगेबाबा वाचताना वाटतं, अरे अगदी शिष्य नसला, तरी हेच विचार अंगीकारलेवते माझ्या आज्ज्यानं. कधी कुनाकडून पाया पडून घेत नसे माझा आज्जा ! गाडगेबाबांसारखाच.
अडानी असून माझ्या आज्ज्यानं घरात कधीच अंधश्रद्धेला थारा दिला नाय.. दारात आलेल्या याचकाला भुकेल्यापोटी परत पाठवलं नाय.. जिथं कचरा, घान दिसंल तिथं स्वच्छता करायला सुरूवात करायचा..
गाडगेबाबा म्हनायचे की “शिक्षन ही लै मोठी गोष्ट हाय. जर तुमच्याकडं पैसं नसत्याल तर घरातली भांडी इका.. बायकापोरांसाठी स्वस्तातली कापडं खरेदी करा.. मोडक्या तोडक्या घरात र्हा, पन पोरापोरींना शिक्षन दिल्याशिवाय राहू नका.”
माझ्या आज्ज्यानं हेच केलं ! लोकांकडं मजूरी केली. विहीरी खनल्या. मुंबैत जाऊन हमाली केली. लै गरीबीत दिस काढलं. पन एका पोराला-माझ्या बापाला इंजिनीयर केलं.
दूसर्या पोराला-माझ्या चुलत्याला प्राध्यापक बनवलं, ज्यो आज भारती विद्यापीठात उच्चपदावर हाय. उरलेले दोघं शेतीत रमले, पन चारही पोरास्नी शिक्षनात कमी केलं नाय…
अप्रत्यक्षरीत्या का हुईना, पन गाडगेबाबांचे संस्कार आज्ज्यानं आमच्यात रूजवले !
…कुठल्याबी गांवात गेल्यावर दिवसा गावातली घान खराट्यानं स्वच्छ करायची आनि रात्री त्याच गावातल्या अडानी बहुजनांच्या लोकांच्या डोक्यातली वाईट विचारांची घान किर्तनानं दूर करायची, हे व्रत घेतलेल्या.. आपल्या विचारांनी अनेक पिढ्यांचं कल्यान करनार्या संत गाडगे महाराजांना कोटी कोटी प्रणाम.
किरण माने.