‘झुंड’ समीक्षा करून उलगडून दाखवावा इतका तो अवघड विषय नाही. तो सभोवतालाच्या बहुसंख्यांकांच्या जीवनाचा विषय आहे. थिएटरमध्ये वाहणाऱ्या शिट्ट्या, पात्रांना रिलेट करणारी कुजबुज आणि प्रेक्षकांचा नाच हाच त्याचा खरा प्रतिसाद आहे. झुंड हा तुमच्या-आमच्या मनातला ‘सवाल’ आहे, त्यामुळे तो भावतो.
आंबेडकरी चळवळ फार प्रयोगशील आहे. नवनवीन आव्हाने स्वीकारते. सृजनशीलतेकडे सतत आगेकूच करत असते, त्याचमुळे ‘दलित साहित्य’ हा आंबेडकरी चळवळीचा सुंदर आविष्कार ठरला होता. आज ही तो त्यामार्गे परिपक्वता घेऊन पुढे जात आहे.
तसेच ‘दलित थिएटर’ वैगरे या सगळ्यांना सोबत चालवणारे प्रा. अविनाश डोळस यांच्या सारखे नावे ही पुढे येतात. हा इतिहास आज नागराज मंजुळे रुपात कालसापेक्ष धोरण घेऊन पुढे येत आहे आणि ते प्रस्थापितांच्या डोळ्यात खुपत आहे हेच त्यांच्या कलाकृतीसाठी स्वागतार्ह आहे अस मी मानतो.
नागराज मंजुळे खरंतर जात वास्तव भोगलेला एक संवेदनशील माणूस आहे. पुरोगामी सवर्णांच्या कल्पनेपलीकडे पोहचण्याच हे कारण नागराजला मोठं करतं. आपण प्रेमचंद आणि ओमप्रकाश वाल्मिकी या प्रकारात तुलनात्मक दृष्टीने जसं आधी बघायचो तसं अछुत कन्या, मुक्ता यांची तुलना फँड्री, झुंड, काला आदींसोबत होत आहे, ही जमेची बाजू मी मानतो.
नुकतंच मित्राच्या बहिणीच्या क्षुल्लक आधार कार्डसाठी कागदपत्रांच्या अभावे जमावाजमित कसरत आठवली. बाप किती हतबल असू शकतो, हे जाणवलं. आमच्या वस्तीतल्या प्रत्येक बाबी नागराज मंजुळे टिपतो हे भावलं, पावसात उड्या मारत मारत प्लास्टिकच्या डब्ब्याचा फुटबॉल आम्ही ही खेळलोय. अवमान, अपेष्टा आमच्या ही पदरी पडली आहे.
व्यसनाधिनता आजच आमचा प्रश्न असतांना त्यांचे बदलते रुपडे आमच्या वस्तीच वास्तव आहे. गावकुसाबाहेर असणे हे आजच्या झोपडपट्टीचं नवं असलेलं रूप आहे, हे आम्ही फार आधीच ओळखलं आहे. अशी कैक कारण ‘झुंड माझी कथा आहे’, असं म्हणायला भाग पाडते.
माझ्या वस्तीत प्रत्येकाची एक स्टोरी आहे, असं मला वाटायचं, पण हे वाटणं जेव्हा व्हिज्युअल फॉर्म मध्ये नागराज मंजुळेने दाखवलं तेव्हा कंठ दाटला. तसंच विमानाचा उडण्यासाठीचा संघर्ष हा सांकेतिक असला तर प्रत्येकापर्यंत पोहचणारा होता.
माझा मित्र प्रशांत म्हणतो, “कॅमेरा हातात आल्यावर सुरुवातीला फार भिती वाटायची. हे जात वास्तवातुन आलेलं न्यूनगंड होतं.” आज हाच कॅमेरा नागराजने इतका बखुबी वापरला आहे की, ‘प्रशांत सारखा तो सर्वांना प्रेरणादायी ठरेल.’
मुख्य म्हणजे या न्यूनगंडात वाढ करण्यासाठी धडपडणाऱ्यांनी आमच्या पोरांना ‘छोटे -मोठे नागराज’ म्हटलं, पण नागराज मंजूळेनेच विपीनसारख्या पोरांवर विश्वास ठेवून झुंड हे दिलेलं उत्तर आहे अस मला तरी वाटतं.
अखेर, नागराज मंजुळे कवी मनाचा माणूस आहे. त्याच्या भाषेत सांगायच तर त्याने नामदेव ढसाळ म्हणतो तस, ‘शहराशहरांना आग लावली!’