तुम्ही जर हायवेवर खूप प्रवास करत असाल आणि त्यावर आकारल्या जाणाऱ्या टोल टॅक्समुळे तुम्ही वैतागून गेला असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
आता महामार्गावर प्रवास करणे स्वस्त झाले असून पुन्हा पुन्हा टोल भरण्यासाठी थांबण्याच्या त्रासातून तुमची सुटका होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता 60 किमीच्या परिघात एकच टोलनाका असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय इतर सर्व टोलनाके हटवले जातील आणि लोकांना या रेंजमध्ये एकदाच टोल भरावा लागेल.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत सरकारच्या अनेक महत्त्वाच्या योजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, आता राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांची संख्या मर्यादित राहणार आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, अशा अनेक तक्रारी येत आहेत ज्यामध्ये 10 किमीच्या परिसरात आणखी एक टोल टॅक्स भरावा लागतो, जो चुकीचा आणि बेकायदेशीर आहे. मात्र, आता लोकांना 60 किमीच्या परिघात एकदाच टोल भरावा लागणार आहे.
म्हणजेच आता इतक्या किलोमीटरच्या परिघात फक्त 1 टोल प्लाझा काम करेल. इतर सर्व टोलनाके हटवले जातील. येत्या ३ महिन्यांत हे काम पूर्ण होईल. तसेच देशातील राष्ट्रीय महामार्गांवर 60 किलोमीटर अंतरात दोन टोलनाके असतील तर त्यातील 1 बंद केला जाईल असं गडकरी म्हणालेत.
दरम्यान, नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अनेकदा महामार्गाच्या कडेला राहणारे लोक तक्रार करत असत की, त्यांना एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी टोल भरावा लागतो, अगदी जवळ राहत असतानाही.
तसेच या समस्येवर तोडगा काढण्याचे कामही केले जाणार आहे. स्थानिकांना टोल भरावा लागणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांना एक पास दिला जाईल, ज्याद्वारे ते महामार्गावर मोफत प्रवास करू शकतील.