मशिदीवरील भोंग्यांच्या वादावरून मनसे नेते राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. जर ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्यात आले नाही तर आम्ही या मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवू असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. दुसऱ्या बाजूला या वादात मशिदीवरील भोंगे उतरविण्यात येऊ नये यासाठी मुंबईतील मशिदींच्या व्यवस्थापकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
त्यामुळे मुंबई पोलिसांनी मुंबईतील १ हजार १४४ मशिदीं पैकी आतापर्यंत ८०३ मशिदींना भोंगे लावण्यासाठी रीतसर परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या अटीवर मुंबई पोलिसांनी ही परवानगी दिली आहे. यामुळे मशिदींच्या व्यवस्थापकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील ८०३ मशिदींवर सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत भोंग्याचा वापर केला जाईल. यामुळे कोणत्याही नागरिकाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी व्यवस्थापकांना केले आहे. सध्या राज ठाकरे यांनी भोंग्याच्या वादात आक्रमकाचा पावित्रा घेतला आहे. त्यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्याचे आवाहन सरकारला केले आहे.
मात्र राज ठाकरेंच्या या भूमिकेला राज्य सरकारने विरोध दर्शविला आहे. दरम्यान आता राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडत एक जाहीर पत्रक काढले आहे. यामध्ये त्यांनी आपली मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबतची स्पष्ट भूमिका मांडली आहे.
यामध्ये त्यांनी, “आमचं मुस्लीम धर्मियांना एवढंच सांगणं आहे की हा सामाजिक विषय आहे हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला, तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानेच दिलं जाईल” असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता उद्या राज्यात काय घडेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.