सध्या देशातील राजकिय वातावरण अनेक कारणांमुळे बिघडले आहे. हिंदुत्व, मशिदींवरील भोंगे, दंगल अशा अनेक गोष्टींचा परिणाम सुव्यवस्थेसोबत नागरिकांवर होताना दिसत आहे. त्यामुळे देशात सुरू असलेल्या या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाष्य केले आहे. तसेच त्यांनी भाजपवर टीका करत दिल्लीची प्रगती सांगितली आहे.
नागपूरमध्ये झालेल्या ‘लोकमत’ वृत्तपत्राच्या सुवर्ण जयंती कार्यक्रमात बोलताना, “देशात एक पक्ष असा आहे जो कुठेही दंगल घडो, त्यातील गुंडांना आणि लफंग्यांना पक्षामध्ये सामिल करुन घेतो. जर तुम्हाला दंगली हव्या असतील तर त्यांच्योसोबत जा, जर शाळा आणि हॉस्पिटल्स हवे असतील तर आमच्यासोबत या” असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
तसेच, “मी देवाकडे दोन गोष्टी मागतो. एक म्हणजे भारत नेहमी जगातील पहिल्या क्रमांकाचा देश राहो. दुसरं म्हणजे जोपर्यंत भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनत नाही तोपर्यंत मला मृत्यू मिळू नये. मला राजकारण नव्हे तर काम करायला येतं. आम्हाला चोरी करता येत नाही, भ्रष्टाचार करता येत नाही. गुंडगिरी करता येत नाही, दंगली घडवता येत नाहीत. पण आम्हाला शाळा आणि रुग्णालये बांधता येतात.” असे केजरीवाल यांनी म्हणले आहे.
यानंतर, “सुरुवातीला दिल्लीमध्ये शाळांची हीच स्थिती होती, आता ही स्थिती बदलली आहे. सरकारी शाळांतील बारावीतील निकाल हा 97 टक्के इतका आहे. सुमारे चार लाख विद्यार्थी हे खासगी शाळांमधून सरकारी शाळांमध्ये आले आहेत.” अशा शब्दात त्यांनी दिल्लीची प्रगती मांडली आहे.
‘लोकमत’ वृत्तपत्राच्या सुवर्ण जयंती कार्यक्रमात अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी “2024 च्या लोकसभा निवडणुका आणि आम आदमी पक्षाची भूमिका” या विषयावर भाष्य केले.