शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलेलं एक विधान त्यांना चांगलंच भोवलंय. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “मी वंचित बहुजन आघाडीवर केलेलं विधान मी मागे घेत आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगाबाद शहरात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी चंद्रकांत खैरेंनी वंचित बहुजन आघाडी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व एमआयएमने भाजपकडून १ हजार कोटी रुपये घेतले” असा वक्तव्य खैरेंनी या बैठकीत केले होते.
यावरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली होती. या वक्तव्यामुळे खैरे यांना कोर्टात खेचण्याचा इशारा VBA च्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. तसेच चंद्रकांत खैरेंच्या संपत्तीची ई़डीकडून चौकशी करावी अशी देखील मागणी VBA कडून करण्यात आली होती.
य़ावरुन चंद्रकांत खैरेंनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे. “लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र होती. तेव्हा या दोन्ही पक्षांवर गंभीर आरोप केले जात होते. त्याचा संदर्भ मी बैठकीत दिला. त्यानंतर अनेकांचे मला फोन आले, तुम्ही केलेले आरोप खोटे आहेत, तेव्हा मी देखील माझे शब्द मागे घेत असल्याचे त्यांना सांगितले. माझ्या दृष्टीने हा वाद मी संपवला आहे. वंचितच्या नेत्यांना तसा निरोप देखील मी दिला आहे.” अशा शब्दात खैरेंनी माफी मागितली आहे.