मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतर आरोपींविरोधात माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज आज मुंबई सत्र न्यायालयाने काही अटी आणि शर्थींसह मंजुर केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
१०० कोटी रुपयांची वसुली केल्याप्रकरणी देशमुख सध्या तुरुंगात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत या प्रकरणाला मुंबई माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी वाचा फोडली होती. सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांची हत्येप्रकरणी वाझे यांचा हात असल्याचे तपासात समोर आले आहे.
“अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमध्ये १०० कोटी रुपयांची वसुलीचे टार्गेट दिले होते. त्याचबरोबर अनिल देशमुख हे पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये ढवळाढवळ करत असतात” , असा आरोप परमवीर सिंग यांनी केला होता.
या आरोपामुळे राजकीय वर्तुळात भूकंप आला होता. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिले होते. या संपुर्ण प्रकरणामुळे अनिल देशमुख यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आता या प्रकरणी वाझे माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार झाले आहेत. न्यायालयानेही त्यांचा माफीनामा काही अटी आणि शर्थींसह मान्य केला आहे. त्यामुळे आता वाझे न्यायालयात कोणती साक्ष देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.