मुंबई: राज्यातील बारावीचे लाखो विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच सोशल मीडियावर निकालाबाबत पसरवल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. काल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीच्या निकालाची घोषणा केली आहे. त्यामुळे निकाल कधी लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
बारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागणार आहे अशी माहिती गायकवाड यांनी दिली.दुपारी ४ वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. निकाल जाहीर करताना दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गांचे गुण गृहीत धरले जाणार आहेत. त्यासाठी राज्य मंडळाने ३०:३०:४० असा निकष जाहीर केला आहे.
या निकषांमध्ये दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण, अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण एकत्र करून यावर्षी बारावीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
राज्यातील कोरोना संसर्गचे रुग्ण पाहता यावर्षी मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण दिले जाणार होते. त्यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकष ठरवले होते. बारावीच्याही परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दहावीप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांनाही अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण दिले जाणार आहेत.