महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. कधीकाळी एकमेकांचे चांगले मित्र असलेले हे दोन पक्ष आता एकमेकांचे शत्रू झालेले आहेत.
याच पार्श्वभूमीवर नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. “मोदी-फडणवीसांनी कारवाई केली तरी चालेल, पण शिवसेनेला साथ देणारच” असं वक्तव्य सुजय विखेंनी केलं आहे. सुजय विखे नगरमध्ये एका पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसासाठी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी हा दावा केलाय.
काय म्हणाले सुजय विखे ?
“दुसरीकडे परिस्थिती काहीही असली तरी नगर जिल्ह्यात आपण शिवसेनेसोबत आहोत. यामुळे पक्ष आणि मोदी-फडणवीसांनी कारवाई केली तरी चालेल, पण शिवसेनेला साथ देणारच, मी खासदार म्हणून निवडून येण्यात ५० टक्के वाटा येथील शिवसेनेचा आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही. मातोश्रीच्या विरोधात, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही मी कधी बोललो नाही” अशी प्रतिक्रिया सुजय विखेंनी यावेळी दिली.
तसेच, “माझे आजही हेच मत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या निकालावरून ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी वेळीच सावध व्हावे, हे मी सांगत आहे” असा इशारा देखील विखेंनी यावेळी दिला.