राज्याच सध्या राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ३३ आणि इतर ७ आमदार असून हे सध्या आसाममध्ये आहेत
शिवसेनेने बोलावलेल्या बैठकीला देखील अनेक आमदार उपस्थित नव्हते. यामुळे महाराष्ट्रात सत्तांतर होणार का असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. यावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले ?
“आम्ही सर्व आमदार आता एकत्र आहोत. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत. आम्हा सर्वांची तीच भावना आहे. आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त आमदारांचे संख्याबळ आहे” अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली आहे.
तसेच “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. आम्ही पुढची दिशा ठरवण्यासाठी संध्याकाळी एक बैठक आयोजित केली आहे. ती बैठक झाल्यावर तुम्हाला त्याचा निर्णय कळवला जाईल” असं देखील शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
यामुळे आज संध्याकाळी एकनाथ शिंदेंचा गट आपली भूमिका स्पष्ट करणार असून महाराष्ट्रात आज रात्री मोठा राजकीय भूकंप होणार हे मात्र निश्चित झालंय.